‘माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला..’; वडिलांच्या निधनानंतर किरण माने यांची भावूक पोस्ट
किरण माने यांनी वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. किरण माने हे त्यांच्या वडिलांना दादा असं म्हणायचे. माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी.. असं त्यांनी या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलंय.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या वडिलांचं निधन झालं. निधनानंतर त्यांनी वडिलांसोबतच्या काही खास आठवणी फोटोरुपात शेअर करत इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले.. असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी किरण माने यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आयुष्यातून बापाचं निघून जाणं म्हणजे खूप मोठा आघात असतो. कुटुंबातल्या प्रत्येकाला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर आपणास देवो हीच प्रार्थना आणि दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,’ असं एकाने लिहिलंय. ‘वडील म्हणजे आपल्या पाठीशी असलेला आधाराचा उत्तुंग हिमालय. याची खरी किंमत ते गेल्यानंतर पावलोपावली जाणवते,’ असं दुसऱ्याने म्हटलंय.
किरण माने यांची पोस्ट-
‘माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी.. खूप धावपळ सुरू होती माझी. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला. नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटनं पुणे एअरपोर्टवर उतरलो. दुसर्या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर जाऊ सातारला, या विचारानं मी नाशिकला निघालोच होतो. पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला. गुढी पाडव्याच्या दिवशी सातारला घरी तीन-चार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि सातारला आलो.
दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, “दादा मी नाशिकला चाललोय आजच लगेच.” काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की ‘शेजारी बस.’ मी बसलो पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले. माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला.
ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले. दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर.’ दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते. ते म्हणाले, “तुझ्या वडिलांकडे सुखी माणसाचा सदरा होता.” तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे. जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.