माधुरीचं हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मनच भरत नाही, 35 वर्षांपूर्वी दररोज रेडिओवर ऐकायला यायचं, आजही…
35 वर्षांपासून हे गाणं ऐकताच प्रत्येकजण ते शेवटपर्यंत ऐकतो. माधुरी दीक्षितच्या डान्सने घातला होता प्रचंड धुमाकूळ. 90 दशकात दररोज सकाळी रेडिओवर ऐकायला यायचं.

हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांइतकीच काही पार्श्वगायकांचीही लोकप्रियता राहिली आहे. आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिकांमध्ये अलका याज्ञिक यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. विशेषतः 90 च्या दशकात त्यांच्या आवाजाची जादू अक्षरशः सर्वत्र पाहायला मिळत होती. कुमार सानू, उदित नारायण यांसारख्या लोकप्रिय गायकांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली.
अलका याज्ञिक यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या आई शुभा याज्ञिक या शास्त्रीय गायिका होत्या. त्यामुळे अलका यांना अगदी लहान वयातच संगीताचे संस्कार मिळाले. अवघ्या सहाव्या वर्षापासून त्यांनी आईकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. बालपणीच त्यांनी आकाशवाणीवर भजन आणि गाणी सादर करण्यास सुरुवात केली होती.
1980 मध्ये ‘पायल की झंकार’ या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. मात्र, 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्याने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अलका याज्ञिक या 90 च्या दशकातील आघाडीच्या महिला पार्श्वगायिकांपैकी एक बनल्या.
‘तू शायर है, मैं तेरी शायरी’ आजही तितकंच लोकप्रिय
अलका याज्ञिक यांच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय गाणी आली. त्यापैकी 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साजन’ चित्रपटातील ‘तू शायर है, मैं तेरी शायरी’ हे गाणं विशेष गाजले. माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या रोमँटिक गाण्याने त्या काळात तरुणाईला अक्षरशः वेड लावले होते.
या गाण्याला अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजाची साथ लाभली तर नदीम-श्रवण यांनी त्याला सुंदर चाल दिली. गीतकार समीर यांनी लिहिलेले रोमँटिक शब्द आणि माधुरी दीक्षितच्या नृत्य-अभिनयामुळे गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली.
माधुरी दीक्षितच्या डान्सने गाण्याला मिळाली खास रंगत
‘साजन’ चित्रपटातील जवळपास सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती. मात्र ‘तू शायर है, मैं तेरी शायरी’ हे गाणं आपल्या रोमँटिक अंदाजामुळे विशेष लक्षात राहिले. माधुरी दीक्षितच्या नृत्याने या गाण्यात आणखी रंग भरला. तिच्या चेहऱ्यावरील भाव, नृत्याची शैली आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजाचा सुंदर मेळ प्रेक्षकांना भावला. आज या गाण्याला जवळपास 35 वर्षे उलटली असली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.