Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या शेवटच्या भेटीविषयी महिमा चौधरी म्हणाली, “ते होळी पार्टीतून जात होते तेव्हा..”

कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात सतीश कौशिक यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सेटवर काम करतानाचा अनुभव कसा होता, याविषयीही महिमा व्यक्त झाली.

Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या शेवटच्या भेटीविषयी महिमा चौधरी म्हणाली, ते होळी पार्टीतून जात होते तेव्हा..
Satish Kaushik and Mahima Chaudhary
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 09, 2023 | 12:08 PM

मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचं आज (गुरुवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी ते बॉलिवूड इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींसोबत होळी साजरी करत होते. जावेद अख्तर, रिचा चड्ढा, अली फजल आणि महिमा चौधरी यांच्यासोबत होळी खेळतानाचे फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते. आता त्यांच्या निधनानंतर महिमा चौधरीची प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाने सतीश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्यासोबतची शेवटची भेट कशी होती, याविषयीही ती व्यक्त झाली.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, “आज सकाळीच मला त्यांच्या निधनाची बातमी समजली. हे खूपच धक्कादायक होतं, कारण एक दिवसआधीच आम्ही होळी खेळलो होतो. हे सर्व अजूनही अविश्वसनीय आहे. त्यादिवशी ते खूप खुश होते आणि प्रत्येकासोबत एंजॉय करत होते. अचानक दुसऱ्या दिवशी जेव्हा असं काही घडतं, तेव्हा त्यावर विश्वास बसत नाही. आयुष्य किती नाजूक आहे, याची जाणीव आपल्याला होते. एखाद्या व्यक्तीसोबत तुमची शेवटची भेट ठरू शकते. ते जेव्हा पार्टीतून जात होते, तेव्हा मी त्यांना मिठी मारली होती.”

कॅन्सरवरील उपचारानंतर महिमा चौधरी जेव्हा पुन्हा कामावर परतली, तेव्हा सतीश कौशिक यांनी तिला आत्मविश्वास मिळवण्यास मदत केली. याविषयी तिने सांगितलं, “त्यांच्याकडून मला खूप पाठिंबा मिळाला. उपचारानंतर मी जेव्हा सेटवर परतले, तेव्हा ते मला म्हणाले की, महिमा तू इतकी चांगली कलाकार आहेस. तू माझ्या प्रॉडक्शन अंतर्गत काम केलं पाहिजे. अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ते सक्रिय होते. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीचं काम सांगितलं. तू आमच्या घरातीलच व्यक्ती आहेत, तुझ्यासोबत काम केलंच पाहिजे, असं ते म्हणाले होते.”

सतीश यांना महिमा चौधरी आणि नीतू सिंग यांच्यासोबत मिळून चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी महिमाला स्क्रिप्टसुद्धा दिली होती. कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात सतीश कौशिक यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सेटवर काम करतानाचा अनुभव कसा होता, याविषयीही महिमा व्यक्त झाली.

“इमर्जन्सी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी फक्त त्यांच्या अभिनयाकडे पाहत राहायचे. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं हसतं-खेळतं आहे की प्रत्येकाला त्यांच्यासोबत राहून सकारात्मक वाटू लागतं. ते आरोग्याविषयीही सजग होते. आरोग्याच्या बाबतीत माझी आता तुमच्याशी स्पर्धा आहे, असं ते मस्करीत म्हणायचे. मी आधी चपात्या खायचो, आता मोजून चपात्या खातो, असं ते म्हणाले. आधी मी आरोग्याची इतकी काळजी करायचो नाही, मात्र आता त्याविषयी खूप सजग झालोय, असंही ते माझ्याशी बोलताना म्हणाले होते. अनुपम खेर आणि त्यांची खूप चांगली मैत्री आहे. अनुपम खेर यांना पाहूनच खाण्याच्या चांगल्या सवयी लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं”, असं महिमा पुढे म्हणाली.