
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या बहुप्रतिक्षित ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता तेव्हाच फार पसंती मिळाली होती आणि लोक चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. आता 5 सप्टेंबरला अखेर हा चित्रपट रिलीज झाला आहे.
चित्रपटात मराठी कलाकारांची फौज
या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात अनेक मराठी कलाकार आहे. मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. या कलाकारांमध्ये भालचंद्र कदम, सचिन खेडेकर आणि गिरीजा ओक, ओकांर राऊत, हरीश दुधाडे,भरत सावले, वैभव मांगले आणि नितीन भजन असे दमदार कलाकार पाहायला मिळतात. या चित्रपटात या सर्वांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मरठी अभिनेता तथा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे.
चित्रपटाची कथा
या चित्रपटात मनोज वाजपेयी एका अत्यंत चलाख आणि हुशार पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणजेच ‘इन्स्पेक्टर झेंडे’ च्या भूमिकेत आहे. तो एका कुख्यात गुन्हेगार ‘कार्ल भोजराज’ याचा पाठलाग करताना दिसतो. कार्ल भोजराज हे नाव कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या नावावरून घेतला आहे. ट्रेलरमध्ये पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील पाठलाग रोमांचक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. तसेच स्टोरीमधील सस्पेन्सही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.
अभिनेते भाऊ कदम यांचीही महत्त्वाची भूमिका
चित्रपटात अभिनेते भाऊ कदम यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. भाऊ कदमचा भूमिकेतील साधेपणा आणि सहजता टीकवूनच त्यांनी पोलिसाची भूमिका अगदी चोख पार पाडली आहे. तसेच ओकांर राऊत आणि हरीश दुधाडे देखील पहिल्यांदाच गंभीर पण सोबतच विनोदी पात्रांमध्ये दिसत आहे. तसेच इतर मराठी कलाकार मंडळींनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
‘इन्स्पेक्टर झेंडें’ची भूमिका साकारलेले मनोज वाजपेयी म्हणजे चित्रपटाचा युएसपी
तर या चित्रपटातील ‘इन्स्पेक्टर झेंडें’ची भूमिका साकारलेल्या मनोज वाजपेयींबद्दल वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कारण जिथे मनोज वाजपेयी असतात तिथे धुमाकूळ तर असतोच. ही भूमिका मनोज यांनी फार मनापासून निभावली आहे. तेव्हा ज्यांना या भूमिकेबद्दल, या पात्राबद्दल विचारणा झाली तेव्हा त्यांनी लगेच हो म्हटलं. याच कारण सांगताना ते म्हणाले की, “चित्रपटातील ‘इन्स्पेक्टर झेंडे’ ची भूमिका मला खूप आवडली. ते केवळ प्रसिद्धीसाठी काम करत नव्हते, तर आपले कर्तव्य बजावत होते आणि त्याच कर्तव्यादरम्यान त्यांनी एका मोठ्या गुन्हेगाराला दोन वेळा पकडलं. त्याचं शौर्य, विनोदबुद्धी आणि मुंबईचा विशेष बाज मला खूप प्रेरणादायी वाटला. त्यांना भेटणे म्हणजे एका पुस्तकातील पात्राला भेटल्यासारखे होते. ट्रेलर फक्त एक झलक आहे, खरा चित्रपट तुम्हाला त्याच्या कथेच्या आत घेऊन जाईल.”
चित्रपटाची कथा हलकी-फुलकी पण खिळवून ठेवणारी
खरोखरंच चित्रपट हलकाफुलका असून प्रेक्षकांना कुठेही कंटाळवाणा वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हाच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आणि आता चित्रपटालाही तेवढाच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.