कॉकरोच जनता पार्टी कुणाची बी टीम? अभिजीत दीपकेंचं एका वाक्यात उत्तर काय?
कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी 'बी-टीम' आरोपांवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. टीकाकारांना त्यांनी 'तुम्हीच ठरवा मी कोणाची बी-टीम' असे आव्हान दिले. उमेश कुमावत यांच्याशी बोलताना, त्यांनी तरुणांना स्वतःचे हिरो बनण्याचा संदेश दिला.

अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टी सुरू केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. अभिजीत दीपके हे भाजप आणि संघाचे बी टीम म्हणून काम करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर दीपकेंनी पहिल्यांदाच त्यावर मौन सोडलं आहे. तसेच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना हसत हसत उत्तर दिलं आहे. मी कुणाची बी टीम आहे, हे एकदा आरोप करणाऱ्यांनी एकत्र बसून ठरवावं आणि नंतर मला सांगा. मी त्यावर उत्तर देईन, असं अभिजीत दीपकेंनी म्हटलं आहे.
टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अभिजीत दीपके यांची मुलाखत घेतली. अभिजीत दीपके यांच्या करिअरपासून ते आंदोलनाच्या प्रवासापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नावर दीपकेंनी दिलखुलास उत्तरं दिली. तसेच भविष्यातील सीजेपीचं प्लानिंगही सांगितलं. यावेळी त्यांनी तरुणांना तुम्हीच तुमचे हिरो बना. कुणाचेही अनुकरण करू नका, असा संदेशही दिला. तसेच आपली स्वत:ची आयडियॉलॉजीही स्पष्ट केली. या शिवाय विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचाही इशारा दिला.
तुम्ही बसा, ठरवा आणि मग…
सुजात आंबेडकर आणि इतरांनी तुम्हाला संघ आणि भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं होतं. तुमचं काय उत्तर आहे? असा सवाल अभिजीत दीपकेंना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. त्यांना सांगायचं तुम्ही सर्व एकत्र बसा. तुम्ही ठरवा. माझ्या मागे कोण आहे? मी कुणाची बी टीम आहे? तुम्ही एकत्र बसून ठरवा. मला सांगा. मी मग उत्तर देतो, असं अभिजीत दीपके म्हणाले.
स्वत:च स्वत:चे हिरो बना
यावेळी त्यांनी जेनजींना महत्त्वाचा सल्ला दिला. माझा कोणत्याही राजकीय पक्षाकडे कल नाही. मी जेनजींना सांगेल तुम्ही स्वतंत्र राहा. राजकीय लोकांमध्ये हिरो बघू नका. तुम्ही इतरांना मोठं कराल तर ते तुमची इज्जत ठेवणार नाही. तुम्हीच स्वत: तुमचे हिरो बना. राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकारांमध्ये हिरो पाहू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
इग्नोर करू नका
राजकारण्यांनी सत्तेतील लोकांनी जनतेला दुर्लक्षित करू नये. नाही तर लोक त्यांना सत्तेतून खाली खेचतील. लोकशाहीत लोकांना इग्नोर केलं तर तुम्हाला ते धडा शिकवतील. जेनजीची ताकद पाहूनच सरकारने प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. सरकारला माहीत आहे. त्यांना वोटची भाषा कळते. आमचा पॉलिटिकल स्टँड हा सरकारच्या बाजूने नसेल आणि विरोधकांच्या विरोधात नसेल. लोकशाही बळकट करण्यावर असेल, असं ते म्हणाले.
