Dharmaveer: प्रेक्षकांना हसविणारा कुशल बद्रिके ‘धर्मवीर’ पाहताना रडला; प्रसाद ओकसाठी लिहिली खास पोस्ट

'धर्मवीर' (Dharmaveer) या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 9.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Dharmaveer: प्रेक्षकांना हसविणारा कुशल बद्रिके धर्मवीर पाहताना रडला; प्रसाद ओकसाठी लिहिली खास पोस्ट
Prasad Oak, Kushal Badrike
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 9:23 AM

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रेक्षकांकडून येतच आहेत, अशातच कलाविश्वातील मंडळींकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटाबाबत अशीच एक पोस्ट अभिनेता आणि कॉमेडियन कुशल बद्रिकेनं (Kushal Badrike) लिहिली आहे. आपल्या विनोदकौशल्याने कुशल नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो, मात्र ‘धर्मवीर’ पाहताना त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याच्यासाठी त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

कुशल बद्रिकेची पोस्ट-

‘एखादा नट एखाद्या भूमिकेला न्याय देतो, एखादा ती भूमिका जगतो पण एखादी भूमिका जिवंत करणारा नट म्हणजे प्रसाद ओक. धर्मवीर सिनेमा बघून आलो आणि पुन्हा एकदा प्रसाददादाच्या कामाच्या प्रेमात पडलो. सिनेमा बघताना साक्षात दिघे साहेबांचा भास होत राहिला. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की आजही त्यांची प्रतिमा ठाणेकरांच्या देवघरात पुजली जाते. आता देवाला दोन तासात मांडता येत नाही येणारही नाही, पण सिनेमा संपताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. आज इतक्या वर्षानंतरही साहेब तुम्ही आमच्यात जिवंत आहात आणि आजही आम्ही तुमच्या संस्कारात आहोत आणि कायम राहू. धर्मवीर आनंद दिघे साहेब थँक्यू,’ अशी पोस्ट कुशलने लिहिली.

मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या, प्रविण तरडे लिखित दिग्दर्शित ‘धर्मवीर’ या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 9.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.