Roop Nagar Ke Cheetey: ‘रूप नगर के चीते’ चित्रपटाने जोडले करण-कुणालच्या मैत्रीचे धागे

| Updated on: Aug 08, 2022 | 8:22 AM

मैत्रीचा असाच हात हातात घेऊन करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर पदार्पण करतायेत. ‘ऑनस्क्रीन’ आणि ‘ऑफस्क्रीन’ जुळलेले मैत्रीचे धागे या चित्रपटातूनही पहायला मिळणार आहेत.

Roop Nagar Ke Cheetey: ‘रूप नगर के चीते’ चित्रपटाने जोडले करण-कुणालच्या मैत्रीचे धागे
करण-कुणालच्या मैत्रीचे धागे
Image Credit source: Tv9
Follow us on

मैत्री कुठे, कधी, कशी होईल? हे सांगता येत नाही. करण परब (Karan Parab) आणि कुणाल शुक्ल (Kunal Shukla) यांच्या मैत्रीचा धागा जुळला तो ‘रूप नगर के चीते’ (Roop Nagar Ke Cheetey) या चित्रपटामुळे. मैत्रीचा असाच हात हातात घेऊन करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर पदार्पण करतायेत. ‘ऑनस्क्रीन’ आणि ‘ऑफस्क्रीन’ जुळलेले मैत्रीचे धागे या चित्रपटातूनही पहायला मिळणार आहेत. त्यांच्या घनिष्ट मैत्रीवर आधारित ‘होऊन जाऊ दे’ हे तितकंच धमाल गाणं मैत्री दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालं. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे. 16 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

क्रिकेटर ते अभिनेता असा प्रवास करणारा अभिनेता करण परब याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये UAE चे प्रतिनिधित्व केले आहे. आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी 2007 मध्ये तो पुण्यात आला. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे शिक्षण घेत असताना करणला अभिनयाची गोडी लागली. त्यानंतर स्वतंत्र थिएटर येथे अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेत त्यांनी आपली आवड जपली. त्यानंतर अनेक जाहिराती, म्युझिक अल्बम, प्रिंट शूट त्यांनी केल्या. आणि आता ‘रूप नगर के चीते’ मध्ये तो मध्यवर्ती भूमिकेत आहे. मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवणाऱ्या कुणाल शुक्ल याने नाटयक्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘बीइंग सेल्फिश’, ‘एक्सपेरीमेंट’ या त्याच्या नाटकांना अनेक पारितोषिकही मिळाली आहेत. ‘रूप नगर के चीते’ मधून तो रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाला आहे.

हे सुद्धा वाचा

‘होऊन जाऊ दे’ हे धमाकेदार गाणं गायक आदर्श शिंदे आणि सौरभ साळुंखे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. जय अत्रे यांनी लिहिलेल्या या गाण्याला बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार मनन शाह यांनी सुरेल संगीताची किनार जोडली आहे. ‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलिवूडमधील अनेक हिट रोमँटिक गाणी मनन शाह यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्याचप्रमाणे ‘नमस्ते इंग्लंड’, ‘कमांडो 2’, ‘कमांडो वन मॅन आर्मी ‘द ब्लॅक मनी ट्रेल’ या हिंदी चित्रपटातील गाण्यांना त्यांचे संगीत लाभले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘चेजिंग द रेनबो’ या लघुपटासाठीही त्यांनी संगीत दिले आहे. संगीतासाठी भारतीय वादयांचा वापर आणि लाइव्ह रेकोर्डिंग ही त्यांच्या संगीताची ख़ास खासियत आहे. आता ‘रूप नगर के चीते’ चित्रपटामधून त्यांच्या संगीताची जादू अनुभवायला मिळणार आहे.