Chiranjeevi | चिरंजीवी यांना कॅन्सर? ट्विट करत दिली आरोग्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती

चिरंजीवी हे लवकरच 'भोला शंकर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मेहेर रमेश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा ॲक्शनपट असेल. यामध्ये तमन्ना आणि किर्ती सुरेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Chiranjeevi | चिरंजीवी यांना कॅन्सर? ट्विट करत दिली आरोग्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती
Megastar Chiranjeevi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2023 | 8:59 AM

हैदराबाद : साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होताच थिएटरमध्ये चाहत्यांची गर्दी पहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून चिरंजीवी यांच्या प्रकृतीविषयी चाहत्यांमध्ये चर्चा होती. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं म्हटलं जात होतं. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता खुद्द चिरंजीवी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत आणि कॅन्सरच्या चर्चांबाबत मौन सोडलं आहे. त्यांनी ट्विट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. ‘मला कर्करोग झाला नाही. परंतु नियमित चाचण्यांमुळे नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान होण्यात मदत झाली’, असं ते म्हणाले. या पॉलीप्सचं निदान झालं नसतं तर ते आरोग्यासाठी धोकादायक बनलं असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चिरंजीवी यांचं ट्विट-

‘काही दिवसांपूर्वी मी एका कॅन्सर सेंटरचं उद्धाटन करताना कॅन्सरबद्दल जागरुकता वाढवण्याची गरज असल्याबद्दल बोललो होतो. मी हेसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्यास कॅन्सर टाळता येऊ शकतं. मी माझ्या आरोग्याबद्दल नेहमीच सतर्क होतो आणि त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आले. मी इतकंच म्हणालो की जर चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे आणि नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजेत’, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘काही माध्यमांना हे नीट समजलं नाही आणि त्यांनी मला कॅन्सर झाल्याची बातमी चालवली. यामुळे विनाकारण गोंधळ निर्माण झाला. अनेक हितचिंतक मला फोन आणि मेसेज करत आहेत. माझं हे स्पष्टीकरण त्या सर्वांसाठी आहे. मी पत्रकारांनाही आवाहन करतो की विषय पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय असं काही लिहू नका. यामुळे अनेकजण माझ्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत.’

चिरंजीवी हे लवकरच ‘भोला शंकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मेहेर रमेश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा ॲक्शनपट असेल. यामध्ये तमन्ना आणि किर्ती सुरेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर दुसरीकडे चिरंजीवी लवकरच आजोबा होणार आहेत. मुलगा रामचरणची पत्नी गरोदर असून त्यांच्या कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.