Bhool Bhulaiyaa 2 Review: मोंजोलिका परतली; कार्तिक आर्यनचा पैसा वसूल ‘भुल भुलैय्या 2’

| Updated on: May 20, 2022 | 1:39 PM

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या भूमिका असलेला 'भुल भुलैय्या 2' (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेत्री तब्बूचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Bhool Bhulaiyaa 2 Review: मोंजोलिका परतली; कार्तिक आर्यनचा पैसा वसूल भुल भुलैय्या 2
Bhool Bhulaiyaa 2
Image Credit source: Instagram
Follow us on

एखाद्या चित्रपटाचा सीक्वेल पाहताना त्याची तुलना मूळ चित्रपटाशी करणं अत्यंत साहजिक आणि स्वाभाविक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भुल भुलैय्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. त्यानंतर आता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या भूमिका असलेला ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेत्री तब्बूचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या थरारपटात दिग्दर्शक अनिस बाजमीने काही नव्या घडामोडी सादर केल्या असून पहिल्या भागाइतक्यात त्या सीक्वेलमध्येही प्रभावी ठरत आहेत.

रुहान रंधावा (कार्तिक आर्यन) आणि रीत ठाकूर (कियारा अडवाणी) हे दोघं एका हिल स्टेशनवर एकमेकांना भेटतात. रुहान आणि रीत एका पडक्या हवेलीत थांबतात जिथे मंजुलिकाचा आत्मा 18 वर्षांपासून बंदिवासात असल्याचं मानलं जातं. चित्रपटातील घडामोडींदरम्यान रुहान हा रूह बाबा बनतो आणि तो भूतांशी, मृत लोकांच्या आत्म्यांशी बोलू शकतो असा दावा करू लागतो. अनेक वर्षांपासून हवेलीत बंदिस्त असलेला आत्मा जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा काय होतं, मंजुलिका तिचा सूड घेणार का, रुह बाबा तिला हाताळू शकेल का, हे सर्व प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

2009 मध्ये ‘भुल भुलैय्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातही मंजुलिका हे पात्र होतं. या सीक्वेलमध्ये मंजुलिका हे पात्र आणि तिचं ‘आमी जे तोमार’ हे गाणं सोडल्यास पहिल्या भागाशी काहीही साम्य नाही. सीक्वेलची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दिग्दर्शक अनिस बाजमीने याआधी नो एंट्री, वेलकम, सिंग इज किंग यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यामुळे कॉमेडीचाही योग्य प्रमाणात तडका त्याने ‘भुल भुलैय्या 2’मध्ये दिला आहे. थरार आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांमध्ये कथेविषयी उत्सुकता निर्माण करतात. छोटा पंडितच्या (राजपाल यादव) एण्ट्रीवर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होतो. पहिल्या भागाप्रमाणेच सीक्वेलमध्ये राजपालने दमदार काम केलं आहे.

पहा व्हिडीओ-

कार्तिकचं अभिनयकौशल्य, नृत्यकौशल्य, कॉमेडी टायमिंग यांना चित्रपटात पुरेसा वाव मिळाला आहे. कियाराने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षी ही भूमिका फारच वेगळी आहे. मात्र भूमिकेवरची पकड तिने संपूर्ण चित्रपटात कायम ठेवली आहे. कुठेही ती अडखळताना किंवा इतर भूमिकांच्या तुलनेत कमी पडताना दिसत नाही. मात्र कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री खास जमू शकली नाही. चित्रपटात तब्बू प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेते. ठाकूर कुटुंबातील संयमी, प्रेमळ सुनेची भूमिका तिने साकारली आहे. मध्यांतरापर्यंत तिचे फार क्वचित सीन्स आहेत, पण मध्यांतरानंतर तिच्या भूमिकेला वेगळंच वळण मिळतं. सीक्वेलमधील तब्बू ही पहिल्या भागातील विद्या बालनइतकीच दमदार वाटते का, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच मिळू शकेल.

बॉलिवूडमधील थरारपटांत कलाकारांच्या मेकअपमध्ये एकसाचेपणा दिसून येतो. स्त्री चित्रपटातील रुहीसारखाच लूक भुल भुलैय्या 2 मधील रीतला दिला आहे. भूत, आत्म्यांचा मेकअप हा नेहमीप्रमाणेच आहे, त्यामुळे त्यात काही नाविन्य आढळत नाही. मेकअपच्या बाबतीत काही नवे प्रयोग करण्यात चित्रपटाला चांगला वाव होता. इतर सहाय्यक कलाकारांमध्ये, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर आणि राजेश शर्मा यांनी दमदार काम केलंय. मिलिंद गुणाजी आणि अमर उपाध्याय यांच्याकडेही चांगल्या भूमिका आहेत. परंतु त्यांचा स्क्रीन टाइम मर्यादित आहे. भूल भुलैया 2 पाहताना तुम्ही निश्चितच कंटाळणार नाही. पण तो तुम्हाला अगदीच अभूतपूर्व अनुभवही देत नाही. कार्तिकच्या चाहत्यांसाठी हा एक चांगला चित्रपट ठरू शकेल.