बॉलिवूडमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींचं भावविश्व आतापर्यंत अनेक चित्रपटात रेखाटण्यात आलंय. वेगवेगळे पैलू अनेक लेखक-दिग्दर्शकांनी त्यांच्या पद्धतीने दाखवले आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘छिछोरे’मध्ये (chhichhore movie review) हेच भावविश्व दाखवलं आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी सिनेमाला ट्रीटमेन्ट दिली, ती लाजवाब आहे. हा सिनेमा (chhichhore movie review) पाहताना प्रत्येक जण यातल्या पात्रांशी कनेक्ट होईल. प्रत्येकालाच आपले कॉलेजमधील दिवस आठवतील. तुम्ही कॉलेजमध्ये केलेली ‘छिछोरी’गिरी तुमच्या डोळ्यासमोर उभी राहिल. या सिनेमात (chhichhore movie review) रोमान्स आणि कॉमेडीच्या मिश्रणासोबत एक उत्तम सामाजिक संदेशही देण्यात आलाय. यशाच्या मागे धावू नका. आपलं मन सांगेल तेच करा हा संदेश या सिनेमातून देण्यात आलाय. चिल्लर पार्टी, दंगल सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि बरेली की बर्फी, नील बटे सन्नाटा सिनेमांचे लेखक नितेश तिवारी या सिनेमाचे दिग्दर्शक असल्यामुळे या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण काही अंशी या सिनेमाने अपेक्षाभंग केलाय.
अनिरुद्ध (सुशांत सिंह राजपूत) आणि माया (श्रद्ध कपूर) चा मुलगा राघव अभ्यासात प्रचंड हुशार आहेत. त्याला इंजिनिअरिंगला अॅडमिशन घ्यायची असते. पण राघव एंट्रन्स परीक्षेत नापास होतो. हा धक्का तो सहन नाही करु शकत आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. अनिरुद्ध आणि मायाचा घटस्फोट झाल्यामुळे राघवची जबाबदारी अनिरुद्धवरच असते. त्यामुळे राघवच्या या अवस्थेला आपणच जबाबदार असल्याची खंत अनिरुद्धला वाटत राहते.
आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अनिरुद्ध त्याला आपल्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी सांगतो. अनिरुद्ध आणि माया सोबत सेक्सा (वरुण शर्मा), डेरेक (ताहिर राज भसीन), एसिड (नवीन पॉलशेट्टी), बेवडा (सहर्ष शुक्ला) क्रिस क्रॉस (रोहित चौहान), मम्मी (तुषार पांडे) या गँगची कॉलेजच्या दिवसातील धमाल या फ्लॅशबॅकमध्ये बघायला मिळते. अनिरुद्धचा हा भूतकाळ ऐकताना राघवची तब्येत अजून बिघडते. अनिरुद्धच्या भूतकाळात असं काय दडलंय? राघव बरा होतो का? अनिरुद्ध आणि मायाचा घटस्फोट का झालेला असतो का? हे ‘लूझर्स’ स्वत:ला कसं सिद्ध करतात? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला ‘छिछोरे’ बघावा लागेल.
या सिनेमात सांगितलेली गोष्ट तुम्ही याआधीही बघितली आहे..त्यामुळे यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही. पण ज्या पद्धतीने ही गोष्ट दिग्दर्शकाने सांगितली आहे, त्याला 100 पैकी 100 गुण. फिल्ममेकिंगमध्ये गोष्ट सांगण्याची कला अवगत असणं आवश्यक असतं. नितेश तिवारींना याची उत्तम जाण आहे. त्यांनी सोपी गोष्ट रंगवून सांगितली आहे ते लाजवाब आहे. खरंतर सिनेमात तोच तो पणा होण्याची शक्यता होती, मात्र दिग्दर्शकाच्या कल्पकतेमुळे त्याची सिनेमावरील पकड कायम शेवटपर्यंत राहते. मुळात आपल्याला काय मांडायचे आहे आणि त्यातून कोणते भावविश्व उभे करायचे आहे हे दिग्दर्शकाला माहित असल्यामुळे जास्त फापट पसारा टळलाय.
सिनेमात छोट्या छोट्या गोष्टींवरही चांगलंच काम करण्यात आलंय. हा सिनेमा जो जीता वही सिकंदर, थ्री एडियट्स, स्टुडेंट्स ऑफ द इयर सारख्या सिनेमांचं मिश्रण असल्याची जाणीव तुम्हाला वारंवार होत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं सिनेमाचं नाव ‘छिछोरे’पेक्षा ‘लूझर्स’ असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. नितेश यांनी सिनेमात अशा कलाकारांना घेतलंय की जे महाविद्यालयीनही वाटतील आणि वयस्करही वाटतील. सिनेमातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकांना न्याय देण्यासाठी आपलं वजनही वाढवलंय. पण कलाकारांचा वयस्कर भूमिकेतील लूक पाहिजे तितका प्रभावी ठरला नाही.
सिनेमाचं कॅमेरावर्क उत्तम आहे. सिनेमात दोन्ही कालखंड उत्तम दर्शवले आहेत. सिनेमातील एका दृश्यात अनिरुध्द सगळयांना सांगते की ‘मैंने शैंपेन की बोतल इसलिए लाकर रखी थी कि बेटे के सिलेक्ट हो जाने के बाद मैं उसके साथ इसे पीकर सेलिब्रेट करूंगा. मैंने बेटे को यह तो बताया कि चुने जाने पर सेलिब्रेट कैसे करना है, मगर यह नहीं बताया कि अगर वह एक्झॅम पास नहीं कर पाया, तो क्या करना है’ असे अनेक भावनिक प्रसंग या सिनेमात आहेत. नितेश यांनी वर्तमान आणि भूतकाळातील दृश्यांमध्ये योग्य ताळमेळ ठेवलाय.
सुशांत सिंग राजपुतने अनिरुद्धच्या भूमिकेत कमाल केली आहे. अनिरुद्धच्या विविध छटा त्याने भन्नाट साकारल्या आहेत. सिनेमात सुशांतने फुल फॉर्ममध्ये बॅटिंग केल्याचं दिसतं. श्रद्धा कपूरचं विशेष कौतुक करावं लागेल. सिनेमात तिला फारसा वाव नाही, मात्र आहे त्या प्रसंगात तिने आपली छाप सोडली. वयस्कर महिलेच्या भूमिकेत मात्र श्रद्धाचा लूक खटकतो. वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नवीन पॉलशेट्टी, सहर्ष शुक्ला, रोहित चौहान, तुषार पांडे या सगळ्याच गँगन फुल टू धमाल केली. विशेष म्हणजे सेक्साच्या भूमिकेत वरुण शर्माने भन्नाट काम केलंय. ग्रे शेड रेजीच्या भूमिकेतला प्रतिक बब्बरही लक्षात राहतो. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही लक्षात राहते. सिनेमातील संगीताने मात्र निराश केलंय. सिनेमातील एकही गाणं लक्षात राहत नाही.
एकूणच काय तर कथेत काही नाविन्य नसलं तरी सिनेमाला दिलेली ट्रीटमेन्ट वेगळी आहे. हा सिनेमा बघतांना तुम्हाला तुमचे महाविद्यालयीन दिवस आठवले तर नवल वाटायला नको. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला तीन स्टार्स..