टोकाचा राग, भावनिक उद्रेक आवश्यक होता..; मृण्मयी गोडबोलेचा हृदयस्‍पर्शी प्रवास

अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'तो ती आणि फुजी' हा चित्रपट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगचा अनुभव तिने सांगितला.

टोकाचा राग, भावनिक उद्रेक आवश्यक होता..; मृण्मयी गोडबोलेचा हृदयस्‍पर्शी प्रवास
मृण्मयी गोडबोले
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2026 | 3:45 PM

सोनी लिव्‍ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’ प्रदर्शित होत आहे. यातील मुख्य अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेनं सेटवरील काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. या चित्रपटासाठी दिलेली भावनिक गुंतवणूक किती सखोल होती, याचा उलगडा अभिनेत्रीने केला आहे. हा चित्रपट जरी मराठी आणि जपानी संस्कृतींचा शांत संगम असला तरी त्यातील पात्रांचा कठीण भूतकाळ पडद्यावर साकारण्यासाठी अशा अभिनयाची गरज होती की, जिथे काल्पनिक कथा आणि वास्तव यातील रेषा पुसट झाली होती.

या भूमिकेतील तीव्रतेबद्दल सांगताना मृण्मयी गोडबोले म्हणाली, “ललित आणि माझ्यामधील ब्रेक-अपचा सीन हा या चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या प्रसंगांपैकी एक होता. तो 13 मिनिटांचा एक सलग ‘वन टेक’ शॉट होता. या प्रसंगासाठी इतका टोकाचा राग आणि भावनिक उद्रेक आवश्यक होता की, मला प्रत्यक्ष ट्रेडमिल उलथवून टाकावं लागलं. तो सीन इतका विध्वंसक होता आणि आमचा आवाज इतका मोठा होता की, शूटिंगच्या ठिकाणी शेजारी घाबरून तिथे जमा झाले. त्यांना वाटलं की खरोखरंच काहीतरी गंभीर घडत आहे. माझ्या करिअरमधील हा आजवरचा सर्वात शारीरिकदृष्‍ट्या आणि भावनिकदृष्‍ट्या थकवणारा सीन होता.”

याविषयी ती पुढे म्‍हणाली, “तुम्ही त्या क्षणात असता, तेव्हा तुम्ही फक्त अभिनय करत नसता, तर तो उद्वेग प्रत्यक्ष जगत असता. पण एक कलाकार म्हणून लोकांची ती घाबरलेली प्रतिक्रिया माझ्या अभिनयाची खरी पावती होती. तो अनुभव खूपच थकवणारा होता, तरीही त्या रात्री मी अत्यंत शांत मनाने घरी गेले, कारण मला माहित होते की आम्ही काहीतरी अतिशय प्रामाणिक आणि वास्तव टिपलं आहे.”

मोहित टाकळकर दिग्दर्शित चित्रपट ‘तो ती आणि फुजी’ प्रादेशिक सिनेमातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या चित्रपटाचं कथानक मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर यांनी साकारलेल्या एका जोडप्याची आहे, ज्यांचं एकेकाळचं उत्कट प्रेम स्वभाव, भिन्‍नता आणि अवास्तव मागण्यांमुळे एकमेकांसाठी त्रासदायक ठरलं होतं. सात वर्षांनंतर नशिबाने त्यांना जपानच्या शिस्तबद्ध आणि विलोभनीय निसर्गात पुन्हा एकत्र आणलं आहे. आता तुटलेली ही नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात का?, याचा निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Follow Us