‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकर म्हणाला..
'जुळून येती रेशीमगाठी' या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याचं उत्तर अभिनेता ललित प्रभाकरने दिलं आहे. ललित आणि प्राजक्ता माळीची ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती.

छोट्या पडद्यावरील काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यात यशस्वी ठरतात. या मालिकेतील भूमिका, कलाकार यांच्यावर प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलेलं असतं की, पुन्हा पुन्हा तशा प्रकारची मालिका तयार व्हावी, अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त होते. अशीच एक अत्यंत गाजलेली मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांची जोडी आजही प्रचंड लोकप्रिय आहे. जोडीदार कसा असावा तर आदित्यसारखा, अशी भावना अनेक तरुणींनी बोलून दाखवली. आदित्य आणि मेघनाला पुन्हा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल का, यासंदर्भात ललित नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला.
काय म्हणाला ललित?
‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत ललित म्हणाला, “जुळून येती रेशीमगाठी ही मालिका छान जमली होती. तो काळ तसा होता, दिग्दर्शक आणि लेखक तसे होते. हे तेव्हाच होऊ शकलं. तेव्हाच्या मालिकांमध्ये खूप फरक होता. आमच्या मालिकेत कोणी खलनायक नव्हतं. परिस्थिती थोडी नकारात्मक दाखवायचे, पण एकत्र कुटुंबाची ती गोष्ट होती. त्यात खरेपणा होता. या मालिकेचा दुसरा भाग यावा असं मला वाटत नाही. कारण ती जादू तेव्हाच तयार झाली होती. त्या-त्या वेळची ती ऊर्जा असते. त्या जादूला पुढे कोणी हात लावायला नको, असं मला वाटतं. ती तशीच जपून राहिली पाहिजे.”
आजही मिळतं तितकंच प्रेम
“मला आजही अनेकजण आदित्य म्हणूनच हाक मारतात. त्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आदित्य आणि मेघनाच्या जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर फॅन पेजेस आहेत. रोज त्यावर नवनवीन पोस्ट आणि व्हिडीओ दिसतात. आम्हाला त्यात टॅग केलं जातं. मला आणि प्राजक्ताला अजूनही लोकांना एकत्र बघायचं आहे. युट्यूबवर चाहते पुन्हा पुन्हा त्या मालिकेचे एपिसोड्स बघतात. हे प्रेम खूप जास्त आहे आणि त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही. पण मी खूप भारावून जातो”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
