अयोध्येच्या पराभवातून काय शिकावं? ‘शक्तीमान’ची पोस्ट चर्चेत

अयोध्येतील जागेबद्दल बोलायचं झाल्यास, तिथे समाजवादी पार्टीचे नेते अवधेश प्रसाद यांनी विजय मिळवला. तर भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला. हा निकाल पाहून अनेकांनी निराशा झाली. या पराभवातून काय शिकलं पाहिजे, याविषयीची पोस्ट मुकेश खन्ना यांनी लिहिली आहे.

अयोध्येच्या पराभवातून काय शिकावं? शक्तीमानची पोस्ट चर्चेत
मुकेश खन्ना यांची पोस्ट
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2024 | 5:01 PM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राम मंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाला. यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनीसुद्धा अयोध्येच्या निकालावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता ‘शक्तीमान’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना यांची पोस्ट चर्चेत आली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राम मंदिराचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अयोध्येत भाजपच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

मुकेश खन्ना यांची पोस्ट-

‘अयोध्या निवडणुकीतील पराभवातून आपण हे शिकायला हवं की भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचं जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोट्यवधींच्या बजेटमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवावेत, मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूरजवळचं खाटू शामचं मंदिर असो.. श्रद्धेच्या स्थळांना टूरिस्ट स्पॉट बनू देऊ नका. तिथे लोकसुद्धा राहतात, त्यांची काळजी घ्या’, असं त्यांनी लिहिलं. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यावेळी अयोध्येचा कायापालट कशा पद्धतीने झाला, याची तुफान चर्चा रंगली होती. त्यामुळे अयोध्येत भाजपचा विजय नक्कीच होईल, असा विश्वास अनेकांना होता. मात्र प्रत्यक्षात निकाल पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.

याआधी सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अयोध्येतील लोकांवर संताप व्यक्त केला होता. रामायणाचा संदर्भ देत सुनील लहरी यांनी लिहिलं होतं, ‘आम्ही हे विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी वनवासातून आल्यानंतर सीता मातेवर शंका घेतली होती. जी व्यक्ती देव प्रकट झाल्यावर त्यांना नकार देत असले तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? स्वार्थी! इतिहास साक्षीदार आहे की अयोध्येतील लोकांनी नेहमीच त्यांच्या खऱ्या राजासोबत विश्वासघात केला आहे. धिक्कार आहे!’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us