देवा… हे आमच्यासोबतच का होतंय? मनिषा कोईराला हतबल… निराश… थरथर कापतच…
नेपाळमधील भीषण महापुराने देशात हाहाकार माजवला असून, अनेक जीव गेले व हजारो बेपत्ता आहेत. या संकटाने मूळची नेपाळची असलेल्या अभिनेत्री मनीषा कोईरालाला खूप दुःखी झाली.

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे अख्खं जग स्तब्ध झालं. या नैसर्गिक आपत्तीने देशात मोठं संकट उभं केलं असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, शेकडो लोकांचे जीव गेले तर हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळमधील पुराच्या या तांडवामुळे बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) देखील हतबल झाली. बऱ्याच जणांना माहीत नसेल पण मनिषा ही मूळची नेपाळची आहे. तिच्या देशातील या गंभीर परिस्थितीमुळे मनिषाचंही हृदय पिळवटून निघालं . सद्गुरुंद्वारा आयोजित ‘इन सॉलिडैरिटी विद नेपाल’ या कार्यक्रमात याबाबतक बोलताना मनिषा अतिशय भावूक झालेली दिसली. नेपाळमधील पुरात आप्तस्वकीयांना गमावणाऱ्या आणि या कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या लोकांप्रती तिने संवेदना व्यक्त केल्या. या कार्यक्रमादरम्यान भावूक झालेली मनिषा पाहून अनेकांना भरून आलं.
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे देश उद्ध्वस्त झाला, अनेक लोक या पुरामुळे प्रभावित झाले. रस्ते वाहून गेले, घरांची वाताहत झाली , कित्येकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं तर काही जण अजूनही बेपत्ता कुटुंबियांचा शोध लागेल या आशेने जंगजंग पछाडत आहेत. या अतिशय कठीण काळात नेपाळच्या लोकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही पुढाकार घेतला.
नेपाळबाबत बोलताना मनिषा कोईराला भावूक
रविवारी आध्यात्मिक गुरु सद्गुरू यांनी आयोजित केलेल्या ‘इन सॉलिडॅरिटी विद नेपाळ’ या कार्यक्रमात सहभागी झालेली मनीषा कोईराला खूप भावूक दिसली. आपला देश या संकटातूनही सावरून पुन्हा उभा राहील, अशी आशा तिने व्यक्त केली. याबाबत बोलताना पुढे मनीषा म्हणाली,’आज गुरूजींनी मला बोलावलं आणि मी कोणताही विचार न करता इथे आले. आम्ही खूप मोठं आणि शब्दांत व्यक्त न करता येण्याजोगं दुःख अनुभवत आहोत. मी पूर्णपणे निःशब्द आणि गोंधळलेली आहे. मला हे सगळं समजूनही घेता येत नाहीये’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.
तिथे जाऊन हे सगळं पाहण्याची हिंमत नाही
भावुक झालेली अभिनेत्री मनीषा कोईराला आपल्या भावना व्यक्त करताना कित्येकदा थांबली, श्वास घेत मग ती पुन्हा बोलू लागली. ‘ आमच्या देशाला वारंवार अशा आपत्तींचा सामना का करावा लागतोय? कधी भूकंप येतो आणि कुटुंबं उद्ध्वस्त होतात, तर कधी अशा भयानक पुराचा सामना करावा लागतो, ज्यामुळे हजारो लोकांना दुःख आणि वेदना सहन कराव्या लागतात. जेव्हा भूकंप झाला होता, तेव्हा मी सिंधुपालचोक येथे गेले होते. तिथे मी कोसळलेली घरं आणि उद्ध्वस्त झालेल्या लोकांचं आयुष्य पाहिलं.. पण आता रसुवा येथे जाऊन हे सगळं पाहण्याचीही माझ्यात हिंमत नाही’ असं म्हणताना मनिषाला अश्रू अनावर झाले.
“निसर्ग किंवा कदाचित आपल्या कर्मामुळे आपल्याला वारंवार एवढ्या वेदना का सहन कराव्या लागतात? या वेदना कमी करता येणार नाहीत का? असा सवालही तिने विचारला. माझ्या भावना कशा समजून घ्यावं, हेच मला कळेनासं झालंय. हे आयुष्य आपल्याकडून आणखी किती वेदना सहन करून घेणारे? असंही तिने विचारलं. मला एवढंच माहित्ये की, जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करतो, तेव्हा त्यातून सावरण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. आपल्याला आपली संपूर्ण ताकद एकवटून हळूहळू पुढे जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आपला देशही तेच करेल. देशातले लोकही तेच करतील.’ असा विश्वास तिने व्यक्त केला.
नेपाळमधील महापुरात अनेकाचा मृत्यू, हजारो बेपत्ता
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुराने हाहा:कार माजला, या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून 4 हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता आहे. तिबेट सीमेजवळ ग्लेशियरचा मोठा भाग कोसळल्यामुळे हा पूर आला होता. संपूर्ण देशाला यामुळे मोठा फटका बसला.
नेपाळमधील पुरांनंतर जनजीवन उद्ध्वस्त झालेलं असताना अनेक हात मदतीसाठी पुढे आले, बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही पुढाकार घेत मदत केली. त्यामध्ये सोनू सूद, अनुपम खेर, संजय दत्त, सोनू निगम, अरुण गोविल, फरहान अख्तर, कंगना रानौत, रश्मिका मंदाना, भूमि पेडणेकर, चित्रांगदा सिंह, नोरा फतेही, अनन्या पांडे, क्रिती सेनन यासह अनेकांचा समावेश आहे.