घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर नाग चैतन्यचं दुसरं लग्न; परदेशात घेणार सप्तपदी?, 7 दिवसांपर्यंत असेल जल्लोष

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नाग चैतन्य याने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर नाग चैतन्यचं दुसरं लग्न; परदेशात घेणार सप्तपदी?, 7 दिवसांपर्यंत असेल जल्लोष
समंथा, नाग चैतन्य, सोभिता
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2024 | 1:29 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता नाग चैतन्यने गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती. आता साखरपुड्यानंतर हे दोघं लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नाग चैतन्यने याआधी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांचे मार्ग वेगळे झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोटो घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभिताला डेट करू लागला होता. आता सोभिताशी तो परदेशात धूमधडाक्यात लग्न करणार असल्याचं कळतंय.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सोभित आणि नाग चैतन्य हे दोघं लवकरच जल्लोषात लग्न करतील. या दोघांचं लग्न हैदराबादमध्ये होणार आहे. त्यानंतर ते रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की विवाहस्थळ निश्चित झाल्यानंतर सोभिता आणि नाग चैतन्य त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करतील. तर ‘Koimoi’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघं पॅरिसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करू शकतात. एक आठवड्यापर्यंत लग्नापूर्वीचे कार्यक्रम आणि मुख्य लग्नसोहळा पार पडतील, असं म्हटलं गेलंय. भव्य डेस्टिनेशन वेडिंगनंतर नाग चैतन्य आणि सोभिता हे त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन करतील. याबद्दल अद्याप दोघांच्या कुटुंबीयांकडून किंवा दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

मुलाच्या साखरपुड्यानंतर अभिनेते नागार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली होती. “सोभिता आणि नागार्जुन लग्न करतील, मात्र आम्हाला काही घाई नाही. आम्ही साखरपुड्याची घाई यासाठी केली, कारण तो दिवस खूप शुभ होता”, असं त्यांनी सांगितलं होतं. नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाशी असलेल्या नात्यात काही कटुता आली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की, समंथा ही नेहमीच त्यांच्यासाठी सुनेसारखी नाही तर मुलीसारखी होती आणि पुढेही असेल. “आमचं नातं कधीच बदलणार नाही. त्यांच्या नात्यात काय घडलं, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी समंथा नेहमीच माझ्या मुलीसारखी आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.