Raanbaazaar: ‘रानबाजार’च्या शेवटच्या भागांनी माजणार खळबळ; ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित?

| Updated on: Jun 09, 2022 | 3:44 PM

वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेब सीरीजचे प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Raanbaazaar: रानबाजारच्या शेवटच्या भागांनी माजणार खळबळ; असंच काहीसं घडलं होतं... कदाचित?
RaanBaazaar
Image Credit source: Youtube
Follow us on

अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ (Raanbaazaar) या वेब सीरिजची घोषणा जेव्हापासून झाली, तेव्हापासूनच त्याची सर्वत्र चर्चा होतेय. यामध्ये तेजस्विनी पंडित (Tejaswwini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचा लूक समोर आल्यानंतर सीरिजच्या कथानविषयीची उत्कंठा वाढली. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या वेब सीरिजची ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित?’ ही टॅगलाईनच बरंच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे ‘रानबाजार’च्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. ‘रानबाजार’ ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेब सीरीजचे प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या दोन भागांमध्ये दडलेली आहेत.

‘रानबाजार’च्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर येऊन थांबलाय, जो प्रेक्षकांना पुढील भाग पाहण्यास प्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक क्षणी उत्कंठा वाढवणारी ही वेब सीरिज आहे. पहिल्याच भागात राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची हत्या झाल्याचं दिसलं. ही हत्या कोणी केली, हा हनी ट्रॅप आहे की या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे, या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार आहे, रत्ना (प्राजक्ता माळी) आयेशाला का आसरा देते, चारुदत्त मोकाशी ( अभिजित पानसे) या सर्व प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात यशस्वी होणार का, मुख्यमंत्रीपदी कोण येणार, सत्तापालट होणार का, या आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा पुढील दोन भागांत होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

या सीरिजमध्ये मोहन आगाशे (मुख्यमंत्री सतीश नाईक), मोहन जोशी (सयाजी पाटील), मकरंद अनासपुरे (पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्पा), उर्मिला कोठारे (निशा), सचिन खेडेकर (युसूफ पटेल), वैभव मांगले (इन्स्पेक्टर पालांडे), अनंत जोग (रावसाहेब यादव), माधुरी पवार (प्रेरणा सयाजीराव पाटील) या सर्वांनीच आपापल्या भूमिका अगदी चोख साकारल्या आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि रावण फ्युचर प्रॉडक्शनने रानबाजार’ची निर्मिती केली आहे.