Pahalgam Attack: “बोटं छाटा…त्या हरामखोरांकडून सुधरायची अपेक्षा…” पहलगाम हल्ल्यावर मराठी सेलिब्रेटींकडूनही संताप
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर मराठी सिनेसृष्टीने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, सौरभ गोखले, तेजश्री प्रधान यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. हल्ल्याचा निषेध करून, न्यायाची मागणी केली जात आहे आणि सरकारकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अख्खा देश हादरला आहे. काश्मीर दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे.धक्कादायक बाब म्हणजे, दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या. मात्र त्यानंतर सर्वत्रच भितीचं आणि दहशतीचं वातावरण आहे.
पण यामुळे काश्मीरमधील स्थानिकांपासून ते संपूर्ण देशभरातील लोकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. सामान्यांपासून ते नेते मंडळी, कलाकार सर्वांनी या पर्यटकांवरील भ्याड हल्ल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडनंतर आता मराठी सिनेसृष्टीतूनही अनेक कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सई ताम्हणकर पोस्ट
याबाबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन खंत व्यक्त केली आहे. सई म्हणाली की, “काश्मीर येथील बातमी ऐकून धक्का बसला. या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. अशाप्रकारची हिंसा कधीच जिंकू शकत नाही. #काश्मीर #शांतता”
प्राजक्ता माळी
त्यानंतर प्राजक्ता माळीनंही पहलगाम हल्ल्यावर एक पोस्ट केली आहे. तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर श्री श्री रविशंकर यांचा एक कोट शेअर केला आहे. त्यासोबत #Pahalgam असंही लिहिलं आहे.
- prajkta mali
अभिनेता सौरभ गोखलेची संतप्त प्रतिक्रिया
यानंतर मराठी अभिनेता सौरभ गोखलेनं संताप व्यक्त करत एक पोस्ट केली आहे. तो म्हणाला की, “पूर्ण भिकेला लागला तरी तो देश सुधारणार नाही… घुसून मारा! #Pahalgam TerroristAttack. सर्व धर्माचा आदर करण्याची शिकवण तुमच्या मुलांना जरूर द्या. परंतु, तुमच्या धर्मावर बोट न ठेवून तुमच्यावर अत्याचार होत असेल तर, ते बोट छाटायची हिंमत, ताकद आणि थर्माभिमानही त्याच्यात जागृत करा! ही काळाची गरज आहे.”

Saurabh Gokhale
तेजस्विनी पंडित संताप व्यक्त करत केली पोस्ट
अभिनेत्री तेजस्विनी पंडित संताप अन् हळहळ व्यक्त करणारी पोस्ट करुन घटनेचा निषेध नोंदवला आहे. तिनं म्हटलं आहे की “अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत… दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते? हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का? हिंदू राष्ट्रात, एक हाती हिंदू सरकारात इतर ही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत? अश्या घटना घडतात तेव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर, इंटेलिजन्स वर विश्वास कसा ठेवायचा? हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही? ‘त्या हरामखोरांकडून’ सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण? इतक्या हल्ल्यांनंतरही “त्यांच्या” घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत आपण? निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्या परिवाराचं सांत्वन कसं करणार आपण? असे अनेक प्रश्न… तुम्हालाही हे भेडसावतात? काळी रात्र , सुन्न मन!” असं म्हणत तिने सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
- Tejaswini Pandit
अभिनेता वैभव तत्त्ववादीची इन्स्टावर स्टोरी
त्यानंतर अभिनेता वैभव तत्त्ववादीनंही इन्स्टावर स्टोरी पोस्ट करुन निषेध व्यक्त केला आहे. पहलगाम असं लिहून वैभवनं हार्ट ब्रेक आणि रागाचे इमोजी शेअर केले आहेत.
अभिनेता आरोह वेलणकरनंही सोशल मीडियावर पोस्ट
अभिनेता आरोह वेलणकरनंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आरोह वेलणकर म्हणाला की, “जम्मू काश्मीर येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यात मुस्लीम नसलेल्या लोकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले… निःशब्द”
अभिनेता सुव्रत जोशीची हल्ल्यावर प्रतिक्रिया
प्रसिद्ध मराठी अभिनेता सुव्रत जोशीनं या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “आज काश्मीरमधून आलेली बातमी ही अत्यंत क्लेशदायक आहे! इस्त्राइलपासून ते काश्मीरपर्यंत जगभरात विविध धर्मातील धर्मांध लोकांनी मांडलेला उच्छाद… सर्व मजहब, Religion आणि धर्म वगैरे एकत्र बुडवून एकदाचा संपवावा… कारण, एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याची ही तृष्णा कधीही न संपणारी आहे. त्यात स्वतःला त्या धर्मातील मानणाऱ्या सूज्ञ वगैरे म्हणवणाऱ्या लोकांची अलिप्तता किंवा मूक पाठिंबा हा अधिक घातक आहे. अरुण कोल्हटकरांच्या ‘शेवटचा अश्रू’ या कवितेचीच आठवण होत आहे.” असं सांगत सुव्रतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- Suvrat Joshi
अशापद्धतीने प्रत्येकजण या हल्ल्याचा निषेध करत राग, संताप, हळहळ व्यक्त करत आपल्या भावना मांडत आहेत. तसेच याबद्दस लवकरात लवकर कठोर पाऊल उचलण्याची सरकारला विनंतीही करत आहेत.
दरम्यान या भ्याड हल्ल्याची टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलीय. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत. त्यांच्या सुरक्षेची पूर्णपणे सरकार काळजी घेताना दिसत आहे.

