
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पूर्व पत्नी रेणु देसाईने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि शिवीगाळप्रकरणी तिने कठोर भूमिका घेतली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने थेट म्हटलंय की आता ती गप्प बसणार नाही. जर कोणी तिला शिवीगाळ केली किंवा खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली तर थेट सायबर पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा तिने दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ट्रोलिंग सहन करत असून आता पाणी डोक्यावरून गेलंय, अशा शब्दांत रेणु व्यक्त झाली. रेणु ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
या व्हिडीओमध्ये रेणु देसाईने सांगितलं की 2012 मध्ये पवन कल्याण यांच्याशी घटस्फोटानंतर तिला सतत लक्ष्य केलं जात आहे. लोक तिच्या वैयक्तिक निर्णयांवरून, पोटगीवरून आणि खासगी नातेसंबंधांवरून विविध प्रकारच्या टिप्पण्या करत आहेत. तिने अशा टिप्पण्यांकडे सहसा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु गेल्या काही दिवसांत ही ट्रोलिंग नियंत्रणाबाहेर गेली आहे. जानेवारी महिन्यात जेव्हा रेणुने रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवरून पत्रकार परिषद घेतली, तेव्हासुद्धा तिच्यावर जोरदार टीका झाली होती. तिने सामाजिक मुद्द्यावर भाष्य केलं, परंतु लोकांनी त्याचाही संबंध तिच्या खासगी आयुष्याशी जोडून खिल्ली उडवली होती.
“जर कोणाला माझ्या कामाबद्दल तक्रार असेल तर ते मोकळेपणे बोलू शकतात, हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. परंतु माझ्या खासगी आयुष्याला त्यात मधे मधे आणणं खूप चुकीचं आहे. काही लोकांनी माझ्याबद्दल इतके आक्षेपार्ह शब्द वापरले, जे ऐकून मी पूर्णपणे खचले होते. तुम्हाला थोडीतरी लाज वाटते का? अशा प्रकारची भाषा वापरताना तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबद्दल विचार करत नाही का? अशा लोकांविरोधात मी आता कठोर पावलं उचलणार आहे आणि गरज भासल्यास मी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंतही सत्य पोहोचवणार. सोशल मीडिया हा कोणाचा अपमान करण्यासाठी दिलेला खुला मंच नाही”, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना फटकारलं आहे.
पवन कल्याण हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. 1997 मध्ये त्यांनी नंदिनीशी पहिलं लग्न केलं होतं. नंदिनीला घटस्फोट दिल्यानंतर ते 2001 पासून रेणु देसाईसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 2009 मध्ये या दोघांनी लग्न केलं. त्यांना अकिरा नंदन आणि आध्या अशी दोन मुलं आहेत. परंतु लग्नाच्या तीन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये रेणु आणि पवन कल्याण यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी रशियन अभिनेत्री अन्ना लेझनेवाशी लग्न केलं. या दोघांनाही दोन मुलं आहेत.