
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 साली आलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं रवी जाधव यांनी तर झी टॉकीजची (आताचं झी स्टुडिओज) ही पहिलीच निर्मिती होती. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करणारे झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले आहेत एक नवा कोरा तमाशापट घेऊन, ज्याचं नाव आहे ‘फुलवरा’. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेपासूनच चित्रपटाबद्दल कमालीचं उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
फुलवराबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, “तमाशा हा माझा आवडता लोककलाप्रकार आहे. तमाशाच्या फडावरती हे कलावंत आपली कला सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तेवढंच रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं. यावरच आधारीत एक विषय माझ्या डोक्यात होता. याचदरम्यान मी ‘द फोक आख्यान’ हा एक अनोखा लोककलाविष्कार बघितला आणि त्या सादरीकरणाने मी भारावून गेलो. सध्याची ही तरुण पिढी ज्या आत्मियतेने आणि तळमळीने आपली लोककला, परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचं काम करत आहेत ते वाखणण्याजोगं आहे.”
“त्यांचा हा ध्यास बघूनच त्यांच्या सोबतीने लोककलेचा एक नवा अध्याय प्रेक्षकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा असा विचार मनात आला आणि त्यातूनच फुलवरा चित्रपटाची गोष्ट तयार झाली. ‘द फोक आख्यान’ ज्याच्या लेखन आणि निवेदनातून सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास थक्क करणारा आहे आणि हर्ष – विजय या तरुण जोडगोळीला असलेली लोकसंगीताची जाण ही कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला अनुभव एकत्र आणला आणि फुलवराची गोष्ट तयार झाली,” असं त्यांनी सांगितलं.
नटरंग हा चित्रपट अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठीचं सुवर्णपान आहे. नटरंग हा एक मैलाचा दगड आहे. आजही या चित्रपटाचं आणि त्याच्या संगीताचं भारूड प्रेक्षकांच्या मनावर आहे. आजच्या तरुण पिढीचा लोक संगीताकडे असलेला कल, यात झालेले बदल या सर्वांची गोष्ट मांडणाऱ्या फुलवरा चित्रपटाची गोष्ट रवी जाधव यांनी जेव्हा ऐकवली तेव्हाच हा चित्रपट करणं ही आजच्या लोककलेसाठीची खरी गरज आहे अशी भावना मनात आल्याचं झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितलं.