सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा; प्रवीण तरडेंच्या ‘बलोच’ चित्रपटाचं जबरदस्त मोशन पोस्टर प्रदर्शित

"पानिपतचं युद्ध हे पराभव नसून शौर्य होतं. हा चित्रपट पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी मला आशा आहे," असं दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणाले.

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा; प्रवीण तरडेंच्या बलोच चित्रपटाचं जबरदस्त मोशन पोस्टर प्रदर्शित
Baloch
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 05, 2023 | 1:47 PM

मुंबई : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता चित्रपट म्हणजे ‘बलोच’. पानिपतच्या पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तव्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका आहे, तर कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. ‘बलोच’ हा चित्रपट येत्या 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठ्यांना गुलामगिरी पत्करावी लागली. ‘बलोच’च्या या मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडेंच्या नजरेत मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे. तर मराठ्यांवर अत्याचार करणारा अफगाणी आहे. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या चित्रपटाबद्दल  , ”बलोच ही एक सकारात्मक गोष्ट आहे. यापूर्वी आपण पानिपतबद्दल ऐकलंय, ते केवळ पराभवाबद्दलच आहे. मात्र पानिपतच्या युद्धानंतर जेव्हा गुलामीच्या अवस्थेत असताना पुन्हा एकत्र येणे, संघर्ष करणे ही गोष्ट प्रामुख्याने दाखवण्यात आली आहे. पानिपतचं युद्ध हे पराभव नसून शौर्य होतं. हा चित्रपट पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी मला आशा आहे.”

याआधी ‘बलोच’चा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यात बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे दिसले. त्यांच्या डोळ्यांतील धगधगणारी आग अनेक भावना व्यक्त करणारी होती. ‘बलोच’ची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांची असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.

प्रवीण तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. उत्तम दिग्दर्शक यासोबतच दमदार अभिनेते अशी त्यांची ओळख आहे.