अभिनयातून का घेतला ब्रेक? प्रिती झिंटाने सांगितलं कारण, म्हणाली “लोक विसरतात की महिलांचं..”

प्रिती झिंटाने 2021 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव जिया आणि मुलाचं नाव जय असं आहे. 2016 मध्ये प्रितीने जिनी गुडइनफशी लग्न केलं. लॉस एंजिलिसमध्ये या दोघांनी लग्न केलं.

अभिनयातून का घेतला ब्रेक? प्रिती झिंटाने सांगितलं कारण, म्हणाली लोक विसरतात की महिलांचं..
प्रिती झिंटा
Image Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2024 | 4:09 PM

अभिनेत्री प्रिती झिंटा ही आजही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तब्बल 17 वर्षांनंतर तिन ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पुनरागमन केलं आहे. तर सात वर्षांनंतर ती चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओलसोबत ती ‘लाहौर 1947’ या चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडमध्ये इतकं यश मिळवल्यानंतर प्रितीन सात वर्षांपूर्वी ब्रेक घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं आहे. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तिने डीडी इंडियाला ही मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

“मला चित्रपटात काम करायचं नव्हतं. मी माझ्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करत होते. मला माझ्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुमचं करिअर आणि काम महत्त्वाचं असतंच. पण लोक ही गोष्ट विसरतात की महिलांचं एक बायोलॉजिकल घड्याळ असतं. मी इंडस्ट्रीत कोणालाच डेट केलं नाही. पण मला माझं स्वत:चं एक कुटुंब हवं होतं. अभिनेत्री म्हणून विविध भूमिका साकारायला मिळणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण या सर्वांत तुम्ही तुमचं स्वत:चं आयुष्य जगायला विसरू नका. मला मुलंबाळं हवी होती. मला त्यावेळी बिझनेसमध्येही खूप रस होता. कारण त्यात मला काहीतरी वेगळं करायला मिळत होतं. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट हीच होती की मला माझ्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. कारण मला खरंच आयुष्यात एकटी पडलेली कुशल अभिनेत्री व्हायचं नव्हतं”, असं प्रिती म्हणाली.

याविषयी ती पुढे म्हणाली, “प्रत्येकजण मला सांगत होतं की तुझी बस, ट्रक किंवा ट्रेन चुकेल (हसते). त्यावेळी मला वाटायचं की ठीक आहे. पण आज मी त्याबद्दल हसत असले तरी ते खरं आहे. काम करणाऱ्या प्रत्येक महिलेबाबतचं हे सत्य आहे. प्रत्येकजण तुम्हाला सांगतो आणि तुम्ही स्वत:ला सांगता की तुम्हाला समानता हवी आहे, तुम्हाला पुरुषाइतकंच काम करायचं आहे. पण तुम्हाला एक बायोलॉजिक क्लॉक (जैविक घड्याळ) असतं आणि हा निसर्ग तुम्हाला समान वागणूक देत नाही. त्यामुळे तुम्ही जे करत आहात, त्यातून तुम्हाला ब्रेक घ्यावा लागतो आणि खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करावं लागतं.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us