इथे येऊन मराठी माणसाला माज शिकवायचा नाही..; मराठी अभिनेत्याने खडसावलं

आज मुंबईत मराठी कलाकाराचं काय अस्तित्व राहिलंय, असा सवाल या मराठी अभिनेत्याने केला आहे. त्याचप्रमाणे इथे येऊन मराठी माणसाला माज शिकवायचा नाही, अशा शब्दांत त्याने खडसावलं आहे.

इथे येऊन मराठी माणसाला माज शिकवायचा नाही..; मराठी अभिनेत्याने खडसावलं
Pushkar Jog
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2026 | 11:28 AM

मुंबई आणि मराठी कलाकार हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला जातो. कार्यक्रमांमध्ये हिंदी स्टार्सना पहिल्या रांगेत आणि मराठी कलाकारांना मागच्या रांगेत बसवलं जातं, असा मुद्दा अभिनेत्री सई ताम्हणकरने उपस्थित केला होता. त्यानंतर आता आणखी एक मराठी कलाकार याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. आपलं आज मुंबईत अस्तित्व काय आहे, असा सवाल या मराठी अभिनेत्याने केला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून पुष्कर जोग आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो मराठी कलाकारांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाविषयी व्यक्त झाला.

‘मॅक्स महाराष्ट्र’ला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर म्हणाला, “आपलं आज मुंबईत अस्तित्व काय आहे? आज मोठमोठ्या बॉलिवूड इवेंट्सना मराठी कलाकारांना बोलवत नाहीत. कार्यक्रमात मागे बसवतात, का? हे इवेंट्स तर मुंबईत होतात ना, तुम्ही करा ना मग उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कार्यक्रम. महाराष्ट्रीयन ऑफ द इअर.. सगळी हिंदी माणसं आहेत. हे असं का? उपेंद्र दादा नाहीये, सुबोध दादा नाहीये? हिरो म्हणून त्यांनी हिंदी चित्रपट केले ना? नुकताच सिद्धार्थचा ‘नांदी टॉक्स’ चित्रपट आला, ज्याचा दिग्दर्शक मराठी आहे. चिन्मय मांडलेकरांचा नेटफ्लिक्सवर चित्रपट आला. मग यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इअर का नाही मिळत? बाहेरच्या हिंदी माणसांना तुम्ही देणार का?”

“तुमचे लागेबांधे तुमच्याकडे ठेवायचे. माझं साहेबांसारखंच मत आहे. इथे येऊन मराठी माणसाला माज शिकवायाच नाही. आम्हाला तर शिकवूच नका. आता दुसरं कोणीच बोलत नाहीये. मी एकटाच बोलतोय मग करा याला ट्रोल.. असं सुरू आहे,” असं तो पुढे म्हणाला.

याआधी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही हिंदीवाल्यांच्या स्टारडमने मराठी कलाकार हुरळून जात असल्याचं म्हटलं होतं. “भारतात हिंदी इंडस्ट्री आर्थिक दृष्ट्या आणि निर्मितीच्या दृष्टीनेही खूप मोठी आहे. त्या तुलनेत आपली मराठी इंडस्ट्री लहान आहे. पण असं असलं तरी कंटेंट हाच हिरो आहे. आपल्याकडे ज्या प्रकारचे विषय हाताळले जातात, तितकी विविधता आम्ही कुठेच पाहिली नाही. पण आपला समाज पटकन हुरळून जातो. आपण आपल्या लोकांचं फार कमी आणि हिंदी कलाकारांचं फार कौतुक करतो. त्यांच्या स्टारडमने फार हुरळून जातो”, असं मत तिने मांडलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us