
Rajpal Yadav : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि ‘भूल भुलैया’ चित्रपटातील छोटा पंडित या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असून सुनावणीदरम्यान न्यायालयाने राजपाल यादवला कडाडून फटकारले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘सहानुभूतीला तिचे स्थान आहे. मात्र कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे’. न्यायालयाने हेही नमूद केले की, सुरुवातीला दिलेल्या आदेशानंतर राजपाल यादवने आत्मसमर्पण केले नाही. मात्र, न्यायालयाकडून दुसऱ्यांदा आदेश जारी झाल्यानंतरच तो तुरुंगात हजर झाला.
शिक्षा रद्द करण्यावर न्यायालय काय म्हणाले?
न्यायालयाने राजपाल यादवला थेट प्रश्न विचारला की, ‘तुम्ही शिक्षा रद्द करण्याची मागणी करत आहात? जेव्हा तुम्ही स्वतः पैसे उधार घेतल्याची कबुली दिली आहे. गुन्हा मान्य करून पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिक्षा झाली मग आता शिक्षा स्थगित करण्याची मागणी का करत आहात? त्यावर वकिलांनी सांगितले की, ‘आम्ही सुरुवातीपासूनच हे प्रकरण सेटल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझ्या क्लायंटने आपल्या शब्दांचे पालन करण्यासाठी आत्मसमर्पण केले आहे. चित्रपटात गुंतवलेली सुमारे 5 कोटी रुपयांची रक्कम परत देण्याचा त्यांचा मानस आहे. आतापर्यंत 3 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलंं.
राजपाल यादवने दाखल केलेल्या जामीन अर्जावर तक्रारदाराकडून अद्याप उत्तर दाखल करण्यात आलेले नाही. याबाबत न्यायालयाने तक्रारदाराला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, ‘तुम्हाला तुमचे उत्तर दाखल करावेच लागेल. फाइल पाहताना अनेक अशा बाबी समोर आल्या आहेत ज्या यापूर्वी आमच्या निदर्शनास नव्हत्या. न्यायालयाने हेही नमूद केले की, राजपाल यादवने याआधीचा आदेश सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र तेथे त्याला कोणतीही दिलासा मिळालेला नाही.
पुढील सुनावणी सोमवारी
सुनावणी पुढे ढकलण्यापूर्वी राजपाल यादवच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ‘मी माझ्या मुवक्किलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो झाला नाही. जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर विरोधी पक्षाचे उत्तर अपेक्षित आहे. त्यामुळे कृपया ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करावी. त्या वेळी मी संपूर्ण तयारीसह न्यायालयात हजर राहीन असं ते म्हणाले.