
रामायण ही मालिका प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेली मालिका होती. रामायण तयार करणारे दिग्दर्शन रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे आज निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली आहे. आनंद सागर यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचे काम केले होते. त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आनंद सागर यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4:30 वाजता मुंबईतील परमहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबाने शेअर केली. कुटुंबाने सोशल मीडियावर आनंद सागर यांचा फोटो असलेली एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी म्हटले की, “आम्ही आमच्या प्रिय वडिलांचे, आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाल्याची माहिती देत आहोत.” या पोस्टमध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराची माहिती देखील देण्यात आली आहे.
आनंद सागर यांनी रामायण यांच्यासोबत रामायण या मालिकेच्या निर्मितीमध्ये योगदान दिले होते. 1987 मध्ये रामायण मालिका तयार होत असताना ते सह-निर्माते होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा त्यांनी पुढे सांभाळला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्पांच्या निर्मिती केलेली आहे.
पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. ‘रामायण’ नंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘जय जय बजरंगबली’ आणि ‘जय शिव शंकर’ सारख्या धार्मिक मालिकांची निर्मिती केली, ज्यामुळे त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे गेला. त्यांनी ‘आँखें’ आणि ‘अरमान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. तसेच आनंद सागर यांनी आपल्या कुटुंबासह लॉकडाऊन दरम्यान रामायणाचे पुनर्प्रसारण केले. त्यावेळी विक्रमी संख्येने ते पाहिले गेले होते.
दरम्यान, आनंद सागर हे गेल्या दशकाहून अधिक काळ पार्किन्सनने ग्रस्त होते. मेंदूतील न्यूरॉन्स हळूहळू बिघडल्याने हा आजार होतो. या आजारामुळे थरथरणे, स्नायू कडक होणे आणि असंतुलन अशा समस्यांना सामोरे जावे लागते. पुरुष आणि महिला अशा दोघांवरी याचा परिणाम होतो. मात्र संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांपेक्षा पुरुषांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.