Chandrayaan 3 | ‘लज्जास्पद, याला हिरो म्हणावं का?’; ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लँडिंगनंतर रणवीर सिंग ट्रोल

'लज्जास्पद.. अन् आपण यांना हिरो मानतो. खरे हिरो तर आपले शास्त्रज्ञ आहेत', असं एकाने लिहिलं. तर 'इतक्या मोठ्या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही. ही काय साधी घटना आहे का?', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

Chandrayaan 3 | लज्जास्पद, याला हिरो म्हणावं का?; चांद्रयान 3च्या यशस्वी लँडिंगनंतर रणवीर सिंग ट्रोल
Ranveer Singh
Image Credit source: Facebook
| Updated on: Aug 24, 2023 | 1:22 PM

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : चार वर्षांपूर्वी ‘चांद्रयान 2’ चंद्राच्या अगदी जवळ असताना कोसळलं होतं. मात्र त्या अपयशातून धडा घेत नव्या जिद्दीने, अधिक ताकदीने 14 जुलै रोजी ‘चांद्रयान 3’ पृथ्वीवरून झेपावलं. 23 ऑगस्ट रोजी ‘चांद्रयान 3’च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावार सॉफ्ट लँडिंग करताच कोट्यवधी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. बुधवारी संध्याकाळपासून संपूर्ण देशभरात याचा जल्लोष साजरा होत असतानाच अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमुळे रणवीरला नेटकरी चांगलंच ट्रोल करत आहेत.

रणवीरला बुधवारी रात्री मुंबईतील एका डबिंग स्टुडिओमधून बाहेर पडताना पापाराझींनी पाहिलं. यावेळी त्यांनी त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. रणवीरने त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्कसुद्धा लावला होता. जेव्हा पापाराझी त्याला ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी मोहीमेवर प्रतिक्रिया देण्यास सांगतात, तेव्हा तो त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून कारमध्ये जाऊन बसतो. रणवीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

‘लज्जास्पद.. अन् आपण यांना हिरो मानतो. खरे हिरो तर आपले शास्त्रज्ञ आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘इतक्या मोठ्या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही. ही काय साधी घटना आहे का?’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘त्यापेक्षा शास्त्रज्ञांकडे जा, तुम्ही चुकीच्या जागी पोहोचलात’, असंही नेटकऱ्यांनी पापाराझींना म्हटलंय.

पहा व्हिडीओ

अमेरिका, चीन, रशिया या बलाढ्य देशांच्या कोट्यवधी डॉलर खर्चाच्या अनेक मोहिमांतूनही जे साध्य झालेलं नाही, ते अवघ्या सहाशे कोटी रुपयांत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी साध्य करून दाखवलं. बुधवारी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी हे सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या पार पडलं. त्यावेळी संपूर्ण देश, जगभरातील शास्त्रज्ञ आणि अन्य देशांमध्ये वसलेले भारतीय नागरिक श्वास रोखून याचं थेट प्रक्षेपण पाहत होते.