मला सैफ अली खानकडे घेऊन चला; हल्ला प्रकरणात संशयित ताब्यात घेतलेल्या तरूणाची मानसिक स्थिती बिघडली

पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे सैफ अली खानच्या हल्लाप्रकरणात संशयित म्हणून पकडण्यात आलेल्या आकाश कनोजियाने TV9 सोबत संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर आलेल्य़ा संकटांचा पाढाच वाचला. तसेच या प्रकरणाचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर झाल्याचही त्याने म्हटलं. एवढच नाही तर त्याला नेमकी कशी अटक केली हेही सांगितलं.

मला सैफ अली खानकडे घेऊन चला; हल्ला प्रकरणात संशयित ताब्यात घेतलेल्या तरूणाची मानसिक स्थिती बिघडली
Mayuri Sajerao | Updated on: Jan 30, 2025 | 5:44 PM

सैफ अली खानवर हल्लाप्रकरणी रोज काहीना काही नवीन अपडेट येताना दिसतात. पकडलेल्या हल्लेखोराची तसेच या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. पण यामध्ये अजून एका नावाची वारंवार चर्चा होताना दिसत आहे ती म्हणजे सैफ हल्लाप्रकरणी संशयित म्हणून पकडण्यात आलेला तरुण आकाश कनोजिया. सैफप्रकरणात त्याचे नाव आल्यापासून त्याच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी बिघडल्या आहेत.

 पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे त्या तरूणाचं आयुष्य उद्ध्वस्त

सैफ अली खानवर हल्ला झाल्याबद्दल पोलिसांनी आकाश कनोजिया याला अटक केली. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला हल्लेखोराचा चेहरा आकाशच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता दिसल्याने छत्तीसगडमधील पोलिसांनी थेट आकाशलाच संशयीत हल्लेखोर म्हणून पकडलं. तीन दिवसांनी खरा आरोपी मिळाल्यानंतर आकाशला सोडण्यात आलं.

परंतु यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणात चुकून त्याचे नाव आल्याने त्याची नोकरी गेली आणि त्याचे लग्न मोडले. पोलिसांच्या चुकीचा त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावरही गंभीर परिणाम झाला. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्या तरूणाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं.

निर्दोष असलेल्या आकाशने TV9 सोबत संवाद साधला

सैफ हल्लाप्रकरणात निर्दोष असलेल्या आकाशने TV9 सोबत संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याची आणि त्याच्या कुटुंबाची कैफीयत मांडली.

आकाशने सांगितले “जेव्हा मी छत्तीसगडच्या दुर्ग स्टेशनवर ट्रेनमध्ये बसलो होतो तेव्हा रेल्वे पोलीस आमच्याकडे आले आणि त्यांनी माझा फोटो दाखवला, आणि त्यानंतर पोलिसांनी मला ट्रेनमधून उतरायला सांगितले. जेव्हा मी विचारले की तुम्ही मला खाली का घेत आहात, तेव्हा पोलीस म्हणाले की मुंबई पोलिसांनी तुला ट्रेनमधून उतरण्यास सांगितले आहे. जेव्हा मुंबई पोलिस माझ्याकडे आले तेव्हा ते म्हणाले की आपण फोटोमध्ये जो माणूस दिसतोय तो तुम्हीच आहात ना.फोटोत तुम्हीच आहात हे तुम्ही मान्य स्वीकार करा.” असं म्हणत पोलिसांनी आकाशला तोच हल्लेखोर असल्याचं कबूल करण्यास सांगितलं.

“सैफ अली खानकडे घेऊन चला…”

पुढची घटना सांगताना आकाश म्हणाला, “मुंबई पोलिसांना मी सांगितले की जर फोटोमधला मी नाहीच आहे तर मी ते का स्विकारावं? मी मुंबई पोलिसांना विनंती केली की तुम्ही मला सैफ अली खानकडे घेऊन जा, जर सैफ अली खान म्हणाले की मी तोच हल्लेखोर आहे, तर तुम्ही मला अटक करा. सकाळी साडेदहा वाजता पोलिसांनी मला पकडले, रात्री 9:30 वाजता मुंबई पोलिस आले आणि मला तिथे रात्रभर चौकशीच्या नावाखाली ठेवण्यात आले, दुपारी 12: 30 ते 1 च्या सुमारास सोडले. पोलिसांनी मला सांगितले की चुकून तुम्हाला पकडलं आपण जाऊ शकता.” असं सांगत आकाशने त्याच्यासोबत नेमकं अटक करण्यापूर्वी काय घडलं ते सांगितंलं.

मी निर्दोष असूनही माझ्यावर हा अन्याय

मात्र या प्रकरणामुळे त्याच्या आयुष्यात आलेल्या वादळाबद्दलही त्याने सांगितले. तो म्हणाला “माझ्यासोबत खूप चुकीचं घडलं आहे. असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये. मी गेल्या 4 दिवसांपासून घरी जात नाही, मला माझ्या आई आणि वडिलांना भेटायलाही नको वाटतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात, प्रत्येकास उत्तर द्यावं लागतं. यामुळे माझ लग्नही मोडलं. मी निर्दोष असूनही माझ्यावर हा अन्याय झाला. त्यामुळे माझी मानसिक स्थिती बरोबर नाहीये.” असं म्हणत आकाशवर आणि त्याच्या कुटुंबावर जे संकट आलं त्याबद्दल त्याने दु:ख व्यक्त केला आहे.

आकाशने टीव्ही 9 च्या माध्यमातून  बोलताना खंत व्यक्त केली

आकाशने टीव्ही 9 च्या माध्यमातून या परिस्थीतबद्दल बोलताना खंत व्यक्त केली आहे. तसेच माझा व्हायरल झालेला फोटो आणि व्हिडिओ हटवावेत. फोटो आणि व्हिडिओंमुळे माझे नाव खराब होत आहे. फोटो आणि व्हिडिओ काढला नाही तर कोर्टात जाईन. असा इशाराही दिला आहे. तसेच त्याच्या परिस्थितीला सैफ अली खान आणि पोलीस जबाबदार असल्याचंही आकाशने म्हटलं आहे.

दरम्यान फैझान अन्सारी यांनी आकाश कनौजियाला दर महिना 11000 रुपयांची मदत करणार असल्याचं म्हटलं आहे. जोपर्यंत आकाशला दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत फैझान अन्सारी दरमहा 11000 रुपये देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us