सलमान खानमुळे ‘या’ सुपरस्टारचं करिअर उद्ध्वस्त; चित्रपटांमुळे करू शकला नाही कमबॅक, ओळखलंत का?
फोटोत दिसणाऱ्या या मुलाला ओळखलंत का? बॉलिवूडमध्ये त्याने दमदार सुरुवात केली होती. मात्र एका चुकीमुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. अभिनेता सलमान खानसोबत त्याने पंगा घेतला आणि हळूहळू त्याला मुख्य भूमिका मिळण्यास कमी झाल्या.

मुंबई : 25 डिसेंबर 2023 | पाण्यात राहून मगरीशी कधीच वैर करू नये, असं म्हटलं जातं. या फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्याला ही गोष्ट फार उशिराने समजली. जेव्हा त्याला या म्हणीचं गांभीर्य समजलं, तोपर्यंत त्याने पाण्यातल्या मगरीशी म्हणजेच बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या एका मोठ्या अभिनेत्याशी पंगा घेतला होता. सलमानच्या बाबतीत या अभिनेत्याकडून एकदा नाही तर दोन वेळा चुका झल्या. सर्वांत पहिली चूक म्हणजे त्याने सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडवर प्रेम केलं आणि दुसरं म्हणजे त्यानंतर त्याने ‘भाईजान’वर गंभीर आरोप केले. त्यानंतरच या अभिनेत्याच्या करिअरला उतरती कळा लागली.
फोटोत दिसणारा हा मुलगा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे. विवेकने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा त्याचा लूक, अभिनय आणि आत्मविश्वास पाहून प्रेक्षकांना वाटलं होतं की हा सुपरस्टार ठरेल, इंडस्ट्रीत मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देईल. ‘कंपनी’ या चित्रपटातून विवेकने इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आणि त्यासाठी त्याला पुरस्कारसुद्धा मिळाला होता. विवेकच्या करिअरची गाडी योग्य मार्गाने पुढे जात होती. साथियाँ, दम, डरना मना है, युवा यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. यानंतर विवेकने ‘क्यों हो गया ना’ हा चित्रपट साइन केला आणि तेव्हापासूनच सर्वकाही बदललं.
‘क्यों हो गया ना’ या चित्रपटात विवेकसोबत अभिनेत्री ऐश्वर्या रायने मुख्य भूमिका साकारली होती. त्यावेळी सलमान खान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं होतं आणि विवेकसोबत तिची जवळीक वाढली होती. इतकंच नव्हे तर विवेकने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. मात्र ऐश्वर्याने त्याच्याविषयी नेहमीच मौन बाळगलं होतं. हे प्रकरण नंतर इतकं वाढलं की विवेकने अचानक एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. सलमान खानने मला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप विवेकने केला होता. या आरोपांनंतर सलमाननेही कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण संपूर्ण प्रकरणानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली. त्याला चित्रपटांमध्ये काम मिळणं कमी झालं आणि त्यासाठी सलमानलाच जबाबदार मानलं गेलं होतं.