Sameer Wankhede | क्रांती रेडकरने ‘कलियुग’च्या त्या व्हिडीओतून कोणावर साधला निशाणा?

| Updated on: May 24, 2023 | 8:38 AM

आज (बुधवार) पुन्हा एकदा वानखेडेंना चौकशीसाठी सीबीआयने बोलावलं आहे. त्याआधी वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. क्रांतीच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

Sameer Wankhede | क्रांती रेडकरने कलियुगच्या त्या व्हिडीओतून कोणावर साधला निशाणा?
क्रांती रेडकर, समीर वानखेडे
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून सोडविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आहे. या आरोपांवरील तपासासाठी एनसीबीचे माजी उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली वानखेडेंची विभागीय चौकशी झाली. त्या चौकशीच्या रिपोर्टवरून सीबीआयने रविवारी आणि सोमवारी समीर वानखेडेंची जवळपास पाच ते सहा तास चौकशी केली. आज (बुधवार) पुन्हा एकदा वानखेडेंना चौकशीसाठी सीबीआयने बोलावलं आहे. त्याआधी वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. क्रांतीच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

लहानपणी आजीने सांगितलेली कलियुगची कथा क्रांतीने या व्हिडीओत सांगितली आहे. या कथेवरून तिने कोणाचंही नाव न घेता चालू घडामोडींवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओत ती म्हणते, “मी जेव्हा लहान होती, तेव्हा माझ्या आजीने मला एक कथा सांगितली होती. कलियुगाची कथा. तिने सांगितलं की कलियुगात सर्वकाही खोटं असतं. असत्य असतं. सगळा दिखाव्याचा खेळ असतो. फसवणूक आणि सूडाची भावना असते. जे लोक चांगलं काम करतात, त्यांना खाली पाडणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र चांगलं काम करणाऱ्यांवर जेव्हा दबाव आणून आणून त्रास दिला जातो, तेव्हा हळूहळू पापाचा धडा भरतो. ज्यादिवशी या चुकीच्या लोकांच्या पापाचा घडा भरेल, तेव्हा भगवान शिवला पृथ्वीवर यावं लागेल. ते प्रलय आणतील.”

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओत ती पुढे म्हणते, “मात्र थांबा, भगवान शिव प्रलय आणण्याआधी तिथे श्रीराम येतात. ते प्रलय न आणण्याची विनंती शंकराकडे करतात. तुम्ही प्रलय आणलात तर पृथ्वीवर जे मोजके चांगले लोक आहेत, ज्यांच्या चांगुलपणामुळे पृथ्वी चालतेय, तेसुद्धा मरतील. त्यानंतर शिव म्हणतात, ठीक आहे, प्रलयचा प्लॅन रद्द.”

या व्हिडीओच्या शेवटी क्रांती कथेचं सार सांगते. “माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की ही पृथ्वी काही मोजक्या चांगल्या लोकांमुळे चालतेय. अशी लोकं खूपच कमी आहेत. आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे की त्यांची साथ द्यायची आहे. मी चांगल्या व्यक्तींच्या सोबत आहे. तुम्ही त्यांच्यासोबत आहात का”, असा सवाल ती करते.

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील छाप्यादरम्यान आर्यनला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने त्याच्या कुटुंबीयांकडे 25 कोटींची लाच मागून 18 कोटी रुपयांवर तडजोडीची तयारी दर्शवली होती. आर्यनाच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागणारा खासगी पंच के. पी. गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचं खोटं चित्रही वानखेडेंच्या पथकाने उभं केलं होतं. तसंच 17 जणांची नावं संशयित म्हणून वगळून त्यांना सोडण्याची परवानगी दिली होती. त्यात एका कथित ड्रग्ज विक्रेत्याचा समावेश होता, असा ठपका एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.