भाऊ.. जरा विचार करून बोल; संचिता उगलेच्या मृत्यूवरील कमेंटमुळे अभिनेता ट्रोल, आता दिलं स्पष्टीकरण
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनानंतर अभिनेता सोराब बेदीने तिच्याविषयी प्रतिक्रिया दिली होती. मात्र यावरून त्याला तुफान ट्रोल करण्यात आलं होतं. आता ट्रोलिंगवर त्याने आपली बाजू मांडली आहे. तो नेमकं काय म्हणाला, ते वाचा..

22 वर्षीय टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री हादरून गेली आहे. एकीकडे याप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत असताना आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या संचिताने रविवारी 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. माध्यमांना प्रतिक्रिया देताना तिच्या कुटुंबीयांनी मानसिक तणाव, पैशांची मागणी आणि मनोरंजनसृष्टीतील दबाव हे तिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. तसंच संचिताच्या इंडस्ट्रीतील सहकलाकारांपैकी किंवा तिच्या ओळखीतीलच कोणीतरी व्यक्ती या मानसिक छळामागे असण्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अशातच ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ या मालिकेतील संचिताचा सहकलाकार सोराब बेदीला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या ट्रोलिंगवर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर केलेल्या वक्तव्यामुळे सोराबला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याविषयी त्याने स्वत:ची बाजू मांडत इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘भाऊ.. बोलण्याआधी विचार करा. एकाच वेळी अनेक पापाराझी माझ्याशी बोलत होते. त्यामुळे कधीकधी त्यांचे प्रश्न ऐकू येत नाहीत. पापाराझींनी मला विचारलं की ती मला का फोन करत होती? मी म्हणालो की संचिता मला खूप दिवसांपासून फोन करत होती. मी सिलिगुडीमध्ये असतानाही आमचं फोनवरून बोलणं झालं होतं. ती बिचारी खूप त्रस्त होती. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मी इतका मूर्ख नाही आणि इतका निर्दयीही नाही.’
अभिनेत्याची पोस्ट-
सोराबने लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्याची बाजू स्पष्ट करण्यासाठी आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओद्वारे त्याने नेटकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला की जेव्हा संचिताच्या आत्महत्येवर अचानक पापाराझी त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तो कोणत्या परिस्थितीत अडकला होता. संचिताने टोकाचं पाऊल उचलण्याबाबत सोराब पापाराझींशी बोलताना म्हणाला होता, “ती अस्वस्थ होती आणि मला फोन करत होती.” त्याच्या याच वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं.
दरम्यान ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी एक निवेदन जारी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संचिताच्या मृत्यूची सर्वसमावेशक आणि पारदर्शक चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.