Sanjay Dutt : मला चांगलं मराठी येतं… वाद वाढताच संजूबाबा बॅकफूटवर, माफी मागत म्हणाला –

दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्तने ' येरवडा जेलमध्येही मराठी शिकलो नाही ' असे मिश्कील वक्तव्य केलं, ज्यामुळे वाद निर्माण झाला. प्रकरण वाढल्यावर त्याने मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करून स्पष्टीकरण दिले व माफी मागितली.

Sanjay Dutt : मला चांगलं मराठी येतं... वाद वाढताच संजूबाबा बॅकफूटवर, माफी मागत म्हणाला -
| Updated on: Sep 10, 2026 | 8:11 PM

बेधडक अंदाज आणि वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) नुकताच त्याच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला. खरंतर त्यावरून वादच पेटला होता. गेल्या आठवड्यात दही हंडी होती. मुंबईतील एका दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्त यानेही हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत तो मंचावर उपस्थित होता. मात्र सरनाईक यांनी त्याला मराठीत काही बोलण्याची विनंती केल्यावर संजय दत्तने जे वक्तव्य केलं, त्यावरून थोडा वाद झाला होता. मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये होतो, तरीही मला मराठी शिकता आलं नाही, असं विधान संजय दत्तने केलं. खरंतर त्याने ते मिश्कील शैलीत केलं पण त्याच्या याच वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याला मराठीत बोलता येत नाही यावरून चर्चा सुरू झाली आणि थोड्याच काळात त्याने वादाचं स्वरूप धारणं केलं.

हा वाद वाढताना दिसल्यावर आता संजय दत्तने बॅकफूटवर गेला आहे. त्याने प्रताप सरनाईक यांना फोन लावला आणि दहीहंडी कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेदरम्यान मी जे बोललो त्यावर त्याने स्पष्टीकरण दिलं, मी ते मजेत बोललो होतो, अशी सारवासारव त्याने केली. माझ्या विधानामुळे, बोलण्यामुळे काही चुकीचा संदेश गेला असेल तर मी त्यासाठी क्षमा मागतो, असं म्हणत संजयने माफी मागितली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक एक मीटिंगमध्ये होते, तव्हाच संजय दत्तचा त्यांना फोन आला. “प्रताप भाई, जय महाराष्ट्र…” असं म्हणत संजयने या संभाषणाची मराठीत सुरूवात केल्याचे समजते.

काय म्हणाला संजय दत्त ?

ठाण्यातील दहीहंडी उत्सवादरम्यान मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत आलेल्या संजूबाबाने स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. “मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये राहूनही मराठी शिकू शकलो नाही,” हे वक्तव्य मी विनोदी अंदाजात केलं होतं, असं त्याने यावेळी सांगितलं. मात्र, माझ्या या वक्तव्याचा गंभीरपणे अर्थ घेतला गेला आणि त्यातून चुकीचा संदेश गेला, असं त्याने स्पष्ट केलं.

“ मला अतिशय चांगलं मराठी येतं. माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा चुकीचा संदेश गेला असेल, तर मी माफी मागतो. माझे कुटुंब मुंबईकर आहे. मी याच मातीत वाढलो आहे आणि महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे” असं सरनाईक यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात पुढे संजय दत्त म्हणाला .

ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणारी दहीहंडी महाराष्ट्रातील प्रमुख दहीहंडींमध्ये गणली जाते. यावर्षीच्या कार्यक्रमात संजय दत्त, सुनील शेट्टी, भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक चित्रपट क्षेत्रातील कलाकार, राजकीय नेते आणि व्यावसायिक उपस्थित होते.

नेटकऱ्यांनी उपस्थित केले अनेक सवाल 

मराठी भाषेबाबत सरनाईक यांच्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक सेलिब्रिटींनी मराठीत भाषण केलं होतं. त्याचदरम्यान संजय दत्तचं “ मराठी शिकू शकलो नाही ” हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं. अनेकांनी त्यावर टीका केली. मराठी शिकण्याची अपेक्षा केवळ रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडूनच केली जाते का? असे प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केले.

अखेर संजय दत्तने यावरून स्पष्टीकरण देत माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. सरनाईक यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान संजय दत्तने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण काढली. त्यांच्या कुटुंबाच्या कठीण काळात बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us