गोदावरीत निर्माल्य टाकणाऱ्यांवर..; नदीच्या प्रदूषणावर सयादी शिंदे स्पष्टच म्हणाले..

गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर सयाजी शिंदे आणि प्रशांत दामले या दोन दिग्गज कलाकारांनी नाशिकमधल्या दोन महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य केलं. गोदावरी नदीचं प्रदूषण आणि नाट्य मंदिरांची दूरवस्था याबद्दल ते काय म्हणाले, सविस्तर वाचा..

गोदावरीत निर्माल्य टाकणाऱ्यांवर..; नदीच्या प्रदूषणावर सयादी शिंदे स्पष्टच म्हणाले..
Sayaji Shinde
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2026 | 10:52 AM

नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने अभिनेते सयाजी शिंदे, प्रशांत दामले यांच्यासह सहा मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत सयाजी शिंदे म्हणाले, “नद्या या आपल्या रक्तवाहिन्या आहेत. नदीच्या पाण्यात मंदिरांमधील निर्माल्य, विशेष म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत भरून जे टाकतात त्यांचा मी निषेध करतो. जे कचरा, निर्माल्य टाकतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यासाठी कडक कायदा करावा.” सयाजी शिंदेंनी कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे गावात दहा हजार वृक्ष लागवड करणार असल्याचं जाहीर केलं. “प्रत्येक वर्षाला आम्ही 2000 झाडे लावणार आहोत. पहिल्या टप्प्यात 2000 झाडे लावण्याची व्यवस्था केली जात आहे. सध्या त्या ठिकाणी झाडे लावणं, त्यांचं संगोपन करणं, पाण्याची व्यवस्था, परवानगी या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीविरोधात 12 तारखेला जे आंदोलन होणार आहे, त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी. मी राज्यभरातील पर्यावरणप्रेमींना, नागरिकांना आवाहन करतो की नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी तुम्ही उपस्थित राहावं. आपल्या पुढील काळासाठी झाड आणि ऑक्सिजन हाच सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे, असं आवाहन सयाजी शिंदेंनी जनतेला केलं आहे.

पुरस्कार स्वीकारताना प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांच्या दूरवस्थेचा मुद्दा मांडला. “नाशिकमध्ये अनेक नाट्यमंदिरे आहेत, ते नव्याने आणि दुरुस्त व्हावे यासाठी मी महापौरांकडे विनंती केली आहे. नाशिकमध्ये नवीन नाट्यमंदिर उभं राहावं अशी मागणीही मी महापौरांना केली. अनेक ठिकाणी नाट्यमंदिर हे कलाकार आणि रसिकांच्या मान्यतेचे असायला पाहिजे. नाट्यमंदिर राजकीय कार्यक्रमांसाठी तयार होतात मात्र तसं व्हायला नको. कमीत कमी जागा आणि योग्य त्या सुविधा या नाट्य मंदिरांमध्ये असायला पाहिजे. नाट्यमंदिर दुरुस्तीसाठी सरकारही प्रयत्न करत आहे, मात्र समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यावर तातडीने निर्णय अपेक्षित आहे. नाशिकमध्ये भोर नाट्यगृह अजूनही बंद आहे, त्यावर तात्काळ महापालिकेनं पावलं उचलावीत,” असं ते म्हणाले.

शहराचा विस्तार वेगाने होत असताना नाशिकमध्ये दुसरं नाट्यमंदिर व्हायला हवं. महाकवी कालिदास कला मंदिराची अवस्थात तशी बरी नाही, अशी तक्रारही त्यांनी यावेळी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us