Shreyas Talapde | ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर अखेर श्रेयस तळपदेनं मागितली माफी; काय आहे प्रकरण?

| Updated on: Feb 14, 2023 | 8:43 AM

आता दहा वर्षांनंतरच चित्रपटातील श्रेयसचा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी श्रेयसला ट्रोल करत आहेत. इतकंच नव्हे तर याप्रकरणी आता श्रेयसने सोशल मीडियावर जाहीर माफीनामासुद्धा पोस्ट केला आहे.

Shreyas Talapde | त्या व्हायरल व्हिडीओनंतर अखेर श्रेयस तळपदेनं मागितली माफी; काय आहे प्रकरण?
Shreyas Talpade
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: इकबाल, ओम शांती ओम, गोलमाल यांसारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडणारा अभिनेता श्रेयस तळपदेला सध्या सोशल मीडियावर वादाचा सामना करावा लागतोय. यामागचं कारण म्हणजे दहा वर्षांपूर्वीचा चित्रपटातील एक सीन आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या सीनमध्ये श्रेयस ओमच्या चिन्हावर पाय ठेवताना दिसत आहे. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कमाल धमाल मालामाल’ या चित्रपटातील हा सीन आहे. आता दहा वर्षांनंतरच चित्रपटातील श्रेयसचा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी श्रेयसला ट्रोल करत आहेत. इतकंच नव्हे तर याप्रकरणी आता श्रेयसने सोशल मीडियावर जाहीर माफीनामासुद्धा पोस्ट केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कमाल धमाल मालामाल या चित्रपटाच्या व्हायरल सीनमध्ये एक वॅन पहायला मिळतेय. श्रेयस तळपदे त्या वॅनला थांबवण्यासाठी जातो आणि ती थांबवण्यासाठी तो त्यावर पाय ठेवतो. श्रेयस जिथे पाय ठेवतो, त्याठिकाणी ओमचं चिन्ह पहायला मिळतं. यावरून आता नेटकरी श्रेयसवर संतापले आहेत. ‘तुझ्यासारख्या कलाकाराकडून हे अपेक्षित नव्हतं’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘कदाचित याच गोष्टीमुळे श्रेयस अजूनही संघर्ष करतोय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

श्रेयस तळपदेचा माफीनामा

हा सीन व्हायरल झाल्यानंतर श्रेयसने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली. ‘माफी’ असं कॅप्शन लिहित श्रेयसने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट लिहिली आहे. ‘शूटिंग करताना बऱ्याच घटकांचा समावेश असतो. त्यातही विशेषकरून अॅक्शन सीन शूट करताना एखाद्याची मानसिकता, दिग्दर्शकांच्या सूचना, सीनसाठी दिला गेलेला वेळ आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. पण या व्हिडीओत तुम्ही जे पाहताय त्यासाठी मी स्पष्टीकरण देण्याचा किंवा स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला इतकंच म्हणायचं आहे की ते सर्व नकळतच घडलं आणि त्यासाठी मी माफी मागतो. मी ते पाहायला पाहिजे होतं आणि दिग्दर्शकांच्याही ती गोष्ट लक्षात आणून द्यायला हवी होती. मी जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावणार नाही किंवा अशी गोष्ट पुन्हा माझ्याकडून होणार नाही’, असं त्याने स्पष्ट केलं.

श्रेयसच्या माफीनाम्यानंतर नेटकऱ्यांनीही त्याची बाजू घेतली. ‘अशा विनम्र भावनेनं मागितलेली माफी आवडली’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुझा विनम्रपणा भावला’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘आपल्या चुका स्वीकारण्यासाठी हिंमत लागते आणि ती तू दाखवलीस’, अशाही शब्दांत काहींनी श्रेयसचं कौतुक केलंय.