आधी लग्नाचं वचन, नंतर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने NRI सोबत केलं असं काही; थेट पोलिसांत FIR दाखल
या प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाचं खोटं आमिष दाखवून एका एनआरआयची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस तेलुगू’ची माजी स्पर्धक आशु रेड्डीविरोधात हैदराबादमध्ये फसणवुकीच्या आरोपाखाली तक्रार दाखल झाली आहे. आशुने एका एनआरआयची 9.35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चर्चेत आल्यानंतर आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. माझ्याविरोधात अफवा पसरवणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करेन, अशा इशारा तिने दिला आहे. ‘माझ्या परवानगीविना जो कोणी चुकीची माहिती किंवा खोटी बातमी पसरवत असेल, त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
धर्मेंद्र नावाच्या एका एनआरआय सॉफ्टवेअर इंजीनिअरने हैदराबादमध्ये आशु रेड्डीसह आणखी तिघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, धर्मेंद्र 2018 मध्ये त्याच्या कुटुंबीयांना भेटायला हैदराबादला आला होता. त्यावेळी एका मित्राने त्याची आशु रेड्डीशी ओळख करून दिली. आशुने धर्मेंद्रला सांगितलं की ती अमेरिकेत शिक्षण घेत आहे. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. धर्मेंद्र त्यावेळी घटस्फोटीत होता. आशु आणि त्याची इतकी मैत्री पुढे वाढली की दोघांनी लग्नाचा विचार केला. आशुनेही धर्मेंद्रला लग्नाचं वचन दिलं आणि त्याच्या घटस्फोटीत असण्याबद्दल काहीच समस्या नसल्याचं सांगितलं.
काही काळानंतर आशुने शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी धर्मेंद्रकडून पैसे घेतले. त्यानंतर फ्लॅट, सोनं आणि कारसह इतर महागड्या गोष्टी खरेदी करण्यासाठी ती धर्मेंद्रकडून पैसे उकळत गेली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आशुने धर्मेंद्रकडून बऱ्याच महिन्यांपर्यंत पैसे घेतले होते. नंतर 2020 मध्ये तिने लग्नासाठी काही वेळ थांबण्यास सांगितलं. जेव्हा या दोघांच्या कुटुंबीयांची भेट होणार होती, तेव्हाच आशुने धर्मेंद्रशी लग्नाला नकार दिला. लग्न मोडल्यानंतर जेव्हा धर्मेंद्रने तिला पैसे परत मागितले, तेव्हा तिने त्यालाही स्पष्ट नकार दिला. सुरुवातीला तिने 70 लाख रुपये परत करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु तेसुद्धा तिला जमलं नाही. नंतर आशुच्या कुटुंबीयांनी दावा केला की ती नैराश्यात आहे आणि तिला धर्मेंद्रशीच लग्न करायचं आहे. त्यानंतर धर्मेंद्रने पुन्हा तिच्यावर विश्वास दाखवत दुसरी संधी दिली. तरी जुलै 2025 मध्ये तिने पुन्हा लग्नाला नकार दिला.
धर्मेंद्रने असाही दावा केला की, जेव्हा आशुने 2025 मध्ये लग्नाचं खोटं आश्वासन दिलं होतं, तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याच्याकडूनही अशाच पद्धतीने पैसे उकळत होती.