बाई गेल्या.. फोन आला अन् छातीत धस्स झालं; सुकन्या मोने यांची भावूक पोस्ट
विजया मेहता यांच्या निधनानंतर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. बातमी आली.. लाइफलाइन, नागमंडलचे सगळे दिवस डोळ्यासमोर गेले.. अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

मराठी रंगभूमीवर अत्यंत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांनी उत्तमोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांना दिल्या नाहीत तर अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक त्यांच्या तालमीत तयार झाले. विजया मेहता यांच्या जाण्याने सोनेरी इतिहासाचं पर्व लयाला गेलं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी वाळकेश्वर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजया यांच्या निधनानंतर कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी त्यांच्यासाठी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. बाई गेल्याचं कळताच छातीत धस्स झालं आणि सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले.., अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.
विजया मेहता यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत सुकन्या मोने यांनी लिहिलं, ‘बाई गेल्या.. असा विजय केंकरेंचा फोन आला आणि छातीत धस्स झालं. त्यांची तब्येत वयोमानाप्रमाणे बरी नव्हती हे कळलं होतं. पण भेटायला जायची हिंमत होत नव्हती. बातमी आली.. लाइफलाइन, नागमंडलचे सगळे दिवस डोळ्यासमोर गेले आणि बाईचा आवाज कानात घुमायला लागला. ते त्यांचं डोळे मिचकावून हसणं, गोड स्वरात अगदी एखाद्या लहानगच्या बाळाला समजवावं असं बोलणं, सगळं सगळं आठवायला लागलं. नागमंडलच्या वेळी माझे केलेले लाड… लाइफलाइनमध्ये खरंतर एकाच भागात माझं काम होतं. परंतु माझं काम आणि माझी त्याला योग्य असलेली प्रकृती बघून माझी भूमिका शेवटपर्यंत त्यांनी ठेवली. नुसती ठेवली नाही तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका मला दिली. माझं महाविद्यालयाचं शेवटचं वर्ष होतं म्हणून मला आणि रेणुकाला (ती एमए करत होती) नानावटी हॉस्पिटलमध्ये जिथे आमचं शूटिंग चालू होतं, तिथे अभ्यासकरता एक वेगळी रुम दिली होती.’
सुकन्या मोने यांची पोस्ट-
‘नागमंडलच्या वेळी माझं दुसरं नाटक चालू होतं, परंतु त्या भूमिकेसाठी त्यांना मीच हवी होती आणि अगदी 15/20 दिवस अगोदर मी त्यात सहभागी झाले. तालीम NCPA मध्ये चालायची, त्यामुळे जिथे माझा प्रयोग असेल तिथे त्या मला त्यांची गाडी जायला यायला द्यायच्या. मी खूप चहा प्यायचे तेव्हा, म्हणून माझ्यासाठी भरपूर चहा पिंपात ठेवलेला असायचा. बाईंच्या कामाची पद्धतच फार वेगळी होती. त्यामुळे ती प्रक्रिया तुम्हाला खूप अभ्यास करायला लावायची आणि समृद्ध करायची. एखादा सीन द्यायच्या आणि आम्हालाच इम्प्रोव्हाइज करायला सांगायच्या आणि मग लेखकाने लिहिलेले संवाद आम्हाला सांगायच्या. त्यामुळे संवाद आपोआप लक्षात राहायचे. माझ्या नृत्याचा, माझ्या केसांचा मला पुरेपूर उपयोग करता आला. बाई अशा काही आपल्याला उदाहरण द्यायच्या की आपोआप आपले हावभाव तसे यायचे. लाइफ लाइनमध्ये माझ्या एका मुलीवर अत्याचार झालेला असतो, तोसुद्धा एका नेत्याच्या मुलाकडून. तेव्हा मला बाईंनी एवढंच सांगितलं की बकरीला बळी द्यायला नेतात, तेव्हा तिला होणाऱ्या वेदना आठव. तुमच्याही डोळ्यासमोर लगेच ते हावभाव आले असतील ना? इतकं सोपं करून सांगायच्या’, असं त्यांनी पुढे लिहिलं.
त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे. ‘प्रारंभी अभिनयातून आपली छाप उमटवल्यानंतर पुढे त्यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं. एकाहून एक असे सरस नाट्य कलावंत त्यांनी घडवले. चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, असं फडणवीसांनी म्हटलंय.