कपिल शर्मासोबतच्या भांडणाला आजही विसरला नाही सुनील; पहिल्याच एपिसोडमध्ये मारला टोमणा

विमानातून प्रवास करताना कपिल शर्मासोबत सुनील ग्रोवरचा वाद झाला आणि त्यानंतर त्याने हा शो सोडल्याचं म्हटलं गेलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर सुनील आणि कपिल पुन्हा एकत्र आले आहेत. टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रिय झालेला ‘द कपिल शर्मा शो’ आता नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कपिल शर्मासोबतच्या भांडणाला आजही विसरला नाही सुनील; पहिल्याच एपिसोडमध्ये मारला टोमणा
Sunil Grover and Kapil Sharma
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2024 | 11:41 AM

कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ची सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेहमीप्रमाणे कपिल शर्माने या शोचं सूत्रसंचालन केलं. मात्र यावेळी कपिलने चाहत्यांना मोठा सरप्राइज दिला. हा सरप्राइज होता सुनील ग्रोवर. बऱ्याच वर्षांनंतर सुनील कपिलच्या शोमध्ये परतला. सहा वर्षांपूर्वी कपिल आणि सुनील यांच्या विमानप्रवासादरम्यान भांडण झालं होतं. या भांडणानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला होता. आता शोमध्ये परतल्यानंतर सुनीलने कपिलला भांडणावरून टोमणा मारला आहे.

30 मार्च रोजी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता रणबीर कपूर हा त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांच्यासोबत आला होता. या पहिल्या एपिसोडमध्ये सुनीलची एण्ट्री एका मोठ्या बॉक्समधून झाली. डफलीच्या भूमिकेत तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र यावेळी सुनीलने सहा वर्षांपूर्वीच्या भांडणाचाही उल्लेख केला.

सेटवर एका मोठ्या गिफ्ट बॉक्सला आणलं जातं. जेव्हा कपिल शर्मा हा गिफ्ट बॉक्स उघडतो, तेव्हा त्यातून सुनील ग्रोवर बाहेर येतो. सुनील बाहेर येताच प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतो. यानंतर दोघंही एकमेकांना जुन्या भांडणावरून उपरोधिक टिप्पणी करताना दिसतात. कपिल शर्मा म्हणतो, “मला असं का वाटतंय की मी या मूर्ख मुलीला आधीसुद्धा भेटलोय.” त्यावर सुनील त्याला उत्तर देतो, “मला पण असं वाटतंय की मी तुम्हाला एका फूड डिलिव्हरी ॲपसाठी फूड डिलिव्हरी करताना पाहिलंय.” त्यावर कपिल सुनीलला विचारतो की, “याचा अर्थ तू माझा चित्रपट झ्विगाटो पाहिलं आहेस?” त्यावर डफलीच्या भूमिकेतील सुनील नकारार्थी उत्तर देतो.

कपिल आणि सुनीलचा संवाद ऐकून उपस्थित प्रेक्षक हसू लागतात. तेव्हा कपिल म्हणतो, “हेच भांडणाचं कारण ठरतं.” वादाचा उल्लेख करत सुनील पुढे म्हणतो, “असो, भांडणं तर होत राहतील. खरंतर काही लोक या भांडणांची मज्जा घेतात. बाहेर मला काहींनी असंही विचारलं की तुमच्या भांडणाचा दुसरा सिझन कधी पहायला मिळेल?”

शो सुरु होण्याआधी सुनीलला जेव्हा पत्रकारांनी कपिलसोबतच्या वादाविषयी प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला, “विमानात बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा खूप वाढणार आहे. त्यावेळी नेटफ्लिक्स भारतात नवीनच होतं. आम्हाला वाटलं की टेलिव्हिजनच्या प्रेक्षकाला जोडून ठेवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हणूनच आम्ही पब्लिसिटी स्टंट म्हणून ते भांडण केलं होतं.” हे बोलताना सुनीलसह इतरांनाही हसू अनावर झालं होतं.

Follow Us