अशोक खरात प्रकरणी प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, सुषमा अंधारे भडकल्या, म्हणाल्या- हे हास्यजत्रेपेक्षा..
महिलांच्या लैंगिक शोषणावर एक शब्द देखील न काढणाऱ्या प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे यांनी सुनावलं. नेमकं काय घडलं?

Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनय, निवेदन, नृत्य आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता माळी तिच्या स्पष्ट आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. यावेळीही तिच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अलीकडेच प्राजक्ता माळी ‘नारी शक्ती वंदन’ या महिला संमेलनात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचीही उपस्थिती होती. या व्यासपीठावर बोलताना प्राजक्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामकाजाचे कौतुक केले.
प्राजक्ता माळी म्हणाली की, ‘भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री अत्यंत कठोरपणे हाताळत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने त्यांच्याकडून महिलांचा सन्मान कसा करावा हे शिकायला हवं. राज्यात सध्या जे काही घडत आहे, त्या संवेदनशील परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संतुलित भूमिका घेतली आहे. जिथे कठोर निर्णय घेण्याची गरज असते, तिथे ते वडिलांसारखे ठाम राहतात आणि जिथे संवेदनशीलता आवश्यक असते, तिथे आईच्या ममतेने परिस्थिती हाताळतात.’
याशिवाय, सार्वजनिक भाषणांमध्ये फडणवीस यांची भाषा आणि संयम यांचाही तिने विशेष उल्लेख केला. ‘त्यांच्यावर कितीही टीका किंवा ट्रोलिंग झालं तरी त्यांच्या बोलण्यातून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला मी ऐकलेला नाही’ असंही ती म्हणाली.
सुषमा अंधारे यांची टीका
प्राजक्ता माळीच्या या वक्तव्यांनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. सुषमा अंधारे यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘प्राजक्ताजी, तुम्ही ‘हास्य जत्रा’च्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने पाहतो. मात्र, राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नांवर एक शब्दही न बोलणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंगबद्दल बोलू लागलात तर ते हास्यजत्रेतील स्किटपेक्षाही अधिक हास्यास्पद वाटतं.’
या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहीजण प्राजक्ता माळीच्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसत आहेत, तर काहीजण तिच्यावर टीका करत आहेत. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी राजकीय विषयांवर भूमिका मांडल्यावर निर्माण होणारा वाद हा नवीन नाही. मात्र, प्राजक्ता माळीच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कला आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा चर्चेत आली आहे.