लोक मला कुचका-मेला म्हणतात, दगडाने ठेचून मारण्याची धमकी देतात..; मराठी अभिनेत्यावर का आली अशी वेळ?

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या या अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांविषयीचा खुलासा केला. प्रेक्षकांकडून अक्षरश: शिव्यांचे मेसेज यायचे, असं त्यांनी सांगितलं.

लोक मला कुचका-मेला म्हणतात, दगडाने ठेचून मारण्याची धमकी देतात..; मराठी अभिनेत्यावर का आली अशी वेळ?
Mahesh Kokate
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 9:51 AM

पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना अनेकदा खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. परंतु एका अर्थी हीच त्यांच्या उत्तम कामाची पोचपावती असते. अभिनेते महेश कोकाटे हे ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेत गंगाधर शास्त्रींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी अनाजीपंतांची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. “लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात, कुचका-मेला म्हणतात, पण हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे,” असं ते म्हणाले. महेश कोकाटे यांनी विविध मराठी मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत महेश कोकाटे म्हणाले, “शिव्या हेच माझ्या कामाचं सर्टिफिकेट आहे. लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात, कुचका-मेला म्हणतात, हाच माझा अवॉर्ड आहे. अनाजीपंतांच्या भूमिकेपासून मला ही सवय झालीच आहे. माझ्या आयुष्यातली पहिली निगेटिव्हि भूमिका ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अनाजीपंतांचीच होती. त्यानंतर ‘अगंबाई सासूबाई’मध्येही माझी नकारात्मक भूमिका होती. त्यानंतरही दोन-तीन मालिकांमध्ये तशाच पद्धतीच्या भूमिका झाल्या. तेव्हा मला जाणवलं की अरे मी खूपच निगेटिव्ह भूमिका करू लागलो आहे. त्यानंतर मध्यंतरी अबोली या मालिकेत सकारात्मक भूमिका साकारली, पण त्यानंतर पुन्हा खलनायकी भूमिकांकडे वळलो.”

“निगेटिव्ह भूमिकेसाठी अभिनेत्याचा खूप कस लागतो. कारण खूप विचार करावा लागतो. अती केल्यानेही ती भूमिका चांगली होऊ शकत नाही. खूप त्रासही होतो आणि तेवढीच मेहनतसुद्धा घ्यावी लागते. मालिकेच्या प्रत्येक एपिसोडवरून प्रेक्षकांचे मेसेज यायचे. ‘तू फक्त पगडी घालून बाहेर ये, तुला दगडाने चेचलं नाही तर बघ..’ अशा शब्दांत ते राग व्यक्त करायचे. काहीजण तर अक्षरश: शिवीगाळ करायचे. अभिनेत्री अश्विनी महांगडेनं तर मला सांगितलं होतं की, तुम्ही साताऱ्याला जाऊ नका. तिकडची लोकं तर तुम्हाला दगडाने चेचणार आहेत,” अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.

Follow Us