‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका नव्या वळणावर; अमोलने बोलून दाखवली शेवटची इच्छा

Appi Amchi Collector Serial New Track : झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत अमोलने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. त्याची ही इच्छा पूर्ण होणार का? 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

अप्पी आमची कलेक्टर मालिका नव्या वळणावर; अमोलने बोलून दाखवली शेवटची इच्छा
'अप्पी आमची कलेक्टर' मालिका नव्या वळणावर
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2024 | 3:21 PM

काही मालिका पात्र प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मालिकेतील पात्र आपल्याच घराचा भाग असल्याचा प्रेक्षक सांगतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’… ही मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अमोलने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. अमोलच्या आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी अमोलच्या सगळ्या इच्छा आणि हट्ट सगळे पूर्ण करत आहेत. अशात त्याने त्याची नवी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे.

रुपाली आणि स्वप्नीलला एक लहान मूल दत्तक घेण्यासाठी अमोल सांगतो. अप्पी आणि अर्जुनदेखील अमोलच्या या सूचनेला पाठिंबा देतात. सगळ्यांच्या समस्या सोडवल्यानंतर, अमोल शेवटी त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवणार आहे. जी ऐकून अप्पी -अर्जुन थक्क होतात. अमोल सर्वांसमोर आपली खरी इच्छा, अप्पी आणि अर्जुनच लग्न असल्याचं सांगतो.

अमोलची ही गोष्ट ऐकून दोघंही नकार देतात, पण बापू आणि विनायक अमोलच्या बाजूने उभे आहेत. अप्पी-अर्जुन विचार करत असतानाच अमोलची तब्बेत अजून खराब होते. डॉक्टर त्याची तपासणी करून अमोलकडे फारसा वेळ उरलेला नसल्याचं सांगतात. आता फक्त एक शस्त्रक्रिया त्याला 5 टक्के जगण्याची संधी देऊ शकते. हे ऐकून अप्पी आणि अर्जुन लग्न करण्यास तयार होतात. आता ही गोष्ट संकल्पच्या कानावर पडणार आहे. अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाचा सोहळ्याची तयारी सुरु आहे.

आपल्या अप्पी माँ आणि मास्टरच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन अमोल पोहचला कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडला या गावात. अमोल-अप्पी तिथे पोहचताच सर्वांचा उत्साह शिगेला पोहचला. लहान मुलं त्याच्यासोबत खेळायला तर आजी- आजोबा अमोलचे लाड करायला त्याला आशिर्वाद द्यायला पोहोचले. अमोलच्या आग्रहनुसार हा विवाह सर्व पारंपरिक विधींसह दणक्यात पार पडणार. पण अमोलची एक अट आहे, की लग्न शस्त्रक्रियेनंतर नाही तर त्याआधीच व्हायला हवं.