रस्ता नसल्याने रुग्णवाहिका आली नाही, गर्भवती पत्नीचा मृत्यू; त्याने कुदळ, फावडे घेऊन रस्ताच बनवला; चंद्रपुरातील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडनकप्पी गावात रस्त्याअभावी गर्भवती पत्नीचा मृत्यू झाल्याने व्यथित झालेल्या तुळशीराम गेडाम यांनी स्वतः कुदळ, फावडे घेऊन रस्ता बनवण्याचा निर्धार केला. त्यांच्या या भूमिकेला ग्रामस्थांनी साथ देत श्रमदानातून १.५ किलोमीटरचा रस्ता तयार केला. यामुळे भविष्यात आरोग्य सुविधा वेळेवर पोहोचण्यास मदत होणार असून, इतर महिलांचा जीव वाचेल.

दोन महिन्यापूर्वी गर्भवती पत्नी वेदनेने विव्हळत होती. मूलाच्या जन्माची वेळ जवळ आली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात नेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याने रुग्णवाहिका बोलावली. गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर झाला अन् जीवघेण्या वेदनेमुळे पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर तो रडत बसला नाही. हतबल झाला नाही. हातावर हात ठेवून मान गुडघ्यात घालून बसला नये. पुन्हा कोणती गर्भवती महिला दगावू नये म्हणून त्याने हातात कुदळ आणि फावडं घेतलं. कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तो एकटाच होता. नंतर गावातील असंख्य हात त्याला मिळाले अन् त्याने थेट रस्ताच बांधला.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडनकप्पी गावातील ही घटना आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर हे दुर्गम भागात हे गाव आहे. दोन महिन्यापूर्वी तुळशीराम गेडाम याची पत्नी संगीता गेडाम हिचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यूच्या दोन महिन्यानंतर त्याने रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला. तुळशीरामने ग्रामस्थांना एकत्र केलं. रस्त्याचं महत्त्व पटवून दिलं. आपण सरकारच्या भरवश्यावर बसायचं नाही. स्वत: रस्ता बनवायचा. नाही तर आज माझ्यावर वेळ आली, उद्या इतर कुणावर येऊ शकते, हे त्याने पटवून दिलं.
ग्रामस्थांनीही त्याला प्रतिसाद दिला. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून सर्वांनी श्रमदानास सुरुवात केली. बघता बघता दीड किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी गावातील सुमारे 20 कुटुंब एकवटले होते. हे सर्व लोक झोळी करून रुग्णांना नेत होते. आता रस्ता झाल्याने रुग्णवाहिका नसली तरी बैलगाडी किंवा इतर वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेता येणार आहे.
संपर्क साधला, फायदा नाही
रस्ता बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रशासनाला संपर्क साधला. पण ठोस असं काही घडलं नाही. माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आता अधिक वाट न पाहण्याचा मी निर्णय घेतला. जे माझ्या नशीबात घडलं, तेच कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं वाटलं. त्यामुळेच मी रस्त्ता बनवण्याचं मनावर घेतलं, असं तुळशीराम यांनी सांगितलं.
प्रत्येक मिनिट महत्त्वाचा
अत्यंत महत्त्वाच्या क्षणी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. माझ्या पत्नीला औषधोपचारांची गरज होती. पण रुग्णवाहिका काही आमच्या गावापर्यंत आली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. आम्ही तिला गमावलं. खराब रस्त्यामुळे आणखी कुणाच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू व्हावा, असं मला वाटत नाही, असं त्याने सांगितलं.
तीन दशके, 20 घरे
घोडनकप्पीमध्ये सुमारे 20 घरे आहेत. गेल्या तीन दशकापासून ही कुटुंब या टेकडी परिसरात राहतात. इथल्या पाड्यावर सिमेंटचा रस्ता आणि अंगणवाडी असली तरी मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताच नाहीये. पावसाळ्यात तर इथून जाणंही कठिण असतं. अशातच एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याला रुग्णालयात नेणं कठिण होऊन जातं. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांनाही खडतर पायवाटेनेच प्रवास करून शाळेत यावं लागतं.
नेमकं काय घडलं?
14 जून रोजी 25 वर्षीय संगीता तुळशीराम गेडाम यांना प्रसव वेदना झाल्या. ग्रामस्थांच्या मतानुसार, संगीताला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण गावापर्यंत रुग्णवाहिका आली नाही. कारण गावाला जोडणारा रस्ताच नव्हता. काही महिलांनी संगीताला उचलून डोंगरातून वाट काढून नेण्याचा प्रयत्न केला. पण जाता आलं नाही. संगीताच्याही वेदना वाढल्या. त्यामुळे घरी परत यावं लागलं. संगीताने घरीच मुलाला जन्म दिला.
पण प्रसूतीनंतर संगीताला प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिची प्रकृती आणखीनच बिघडली. आरोग्य विभागाची टीम गावात आली. त्यांनी उपचार सुरू केला. पण अधिक चांगला इलाज करण्यासाठी संगीताला रुग्णालयात न्यावं लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे संगीताला दगडगोटे घेऊन जाणाऱ्या गाडीतून नेण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
