अरुंधती के मन मे फुटा लड्डू? आशुतोषनं मन मोकळं केलं, अप्पासाहेब देशमुख लग्न लावून देणार?

| Updated on: Mar 11, 2022 | 4:48 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक अत्यंत विलक्षण वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषने देशमुख (Omkar Gowardhan) कुटुंबीयांसमोर अरुंधतीवरील त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. हे स्वत: अरुंधतीनेही (Madhurani Prabhulkar) दारामागून ऐकलं आहे.

अरुंधती के मन मे फुटा लड्डू? आशुतोषनं मन मोकळं केलं, अप्पासाहेब देशमुख लग्न लावून देणार?
Aai Kuthe Kay Karte
Image Credit source: Hotstar
Follow us on

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक अत्यंत विलक्षण वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषने देशमुख (Omkar Gowardhan) कुटुंबीयांसमोर अरुंधतीवरील त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. हे स्वत: अरुंधतीनेही (Madhurani Prabhulkar) दारामागून ऐकलं आहे. त्यामुळे अरुंधती आशुतोषच्या मैत्रीला नाकारत त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल का, असं वाटत असतानाच मालिकेत वेगळं वळण पहायला मिळालं. यशच्या बोलण्यावरून अरुंधती आशुतोषला भेटते आणि त्याच्याशी स्पष्टपणे बोलण्यास तयार होते. आशुतोषही अरुंधतीसमोर त्याचं मन मोकळं करतो. त्याचं कॉलेजपासून अरुंधतीवर असलेलं प्रेम, भारतात पुन्हा आल्यावर जुळून आलेल्या गोष्टी यांविषयी तो अरुंधतीला समजावून सांगतो.

आशुतोषने केलं मन मोकळं

“मी तुला विसरून जाईन असं मला वाटलं होतं. पण मी तुला कधी विसरूच शकलो नाही. प्रेम या कल्पनेचं मूर्त रुप तू होतीस. तू एक अशी इमेज होतीस, जी माझ्या मनावर कायमची कोरली गेली होती. ती मी माझ्या मनातून कधीच काढून टाकू शकलो नाही. हे फक्त माझ्या मनात होतं, इतर कोणालाही कधीच याबद्दल बोललो नाही. माझ्या मनात तू जशी होतीस, तू तशी आजही आहेस,” अशा शब्दांत आशुतोष त्याचं प्रेम अरुंधतीसमोर व्यक्त करतो. हे प्रेम व्यक्त करताना कोणतीच अपेक्षा नसल्याचंही तो सांगतो. अरुंधतीने घेतलेला निर्णय त्याला मान्य असेल असंही तो सांगतो.

अरुंधतीचं स्पष्टीकरण

आशुतोषच्या मनातलं सगळं ऐकल्यावर अरुंधती तिची बाजू मांडते. “मी आजपर्यंत फक्त अनिरुद्ध देशमुख या एकाच माणसावर प्रेम केलं आणि फक्त त्यांचाच विचार केलाय. मला तुमच्याविषयी खूप आदर आहे. तुमच्याशी बोलताना, वागताना मला कधीही अवघडल्यासारखं होत नाही. तुमच्यासमोर मोकळेपणाने बोलताना मला अडचण वाटत नाही. तरीही मला ती मर्यादा ओलांडायची नाहीये. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अनिरुद्ध माझ्या मनातून कधीच जाणार नाहीत. पण आजही आयुष्याचा जोडीदार म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर अनिरुद्धच येतात. बाकी मैत्री, एकत्र काम याबद्दल माझी काहीच अडचण नाही. पण त्याहून जास्त मला गुंतता येणार नाही,” असं ती स्पष्ट करते. अरुंधतीला मैत्री तोडायची नाही हे जाणून आशुतोषचा जीव भांड्यात पडतो. मात्र भविष्यात घडू शकणाऱ्या घटनांची कल्पना मात्र तो अरुंधतीला देतो. “जगातल्या अनेक लोकांना आपली मैत्री खटकणार आहे. यानंतरही अनेक लोकं याबद्दल काही ना काही बोलणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनात क्लिअॅरिटी आहे, तोपर्यंत आपण यातल्या कोणत्याच गोष्टीची पर्वा करण्याचं कारण नाही,” असं तो अरुंधतीला समजावून सांगतो.

इकडे अनघा आणि अविनाश हे अप्पांना घरी घडलेल्या सर्व घटना सांगतात. तेवढ्यात कांचन देशमुख आल्याचं पाहून अप्पासुद्धा त्यांच्या मनातलं बोलून दाखवतात. “यांच्या मनातली घाण स्वच्छ होणारच नाही. अनिरुद्ध आता अरुंधतीचा नवरा नाही. पण बदललेली परिस्थिती तुम्हाला समजून घ्यायचीच नाही. मी असतो तर त्याला सांगितलं असतं, मी माझ्या लेकीला समजावतो, तू तिच्याशी लग्न कर,” असं थेट अप्पा म्हणतात. अप्पांच्या तोंडून अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा विषय ऐकून कांचन देशमुखांच्या भुवया उंचावतात. त्यामुळे मालिकेत पुढे नेमकं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आशुतोषने दिलेली प्रेमाची कबुली ऐकून अप्पा खरंच त्या दोघांचं लग्न लावतील का, अरुंधती-आशुतोषच्या मैत्रीत कोणते नवे अडथळे येतील, हे मालिकेच्या आगामी भागातून स्पष्ट होईल.

हेही वाचा:

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?