AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतील 'अरुंधती' या व्यक्तीरेखेने असंख्य महिलांना एक वेगळंच बळ दिलं आहे. आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढणाऱ्या अरुंधतीला हे बळ देणारे हातही एका स्त्रीचेच आहेत. लेखिका मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) हे या मालिकेचं संवादलेखन करतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची ही विशेष मुलाखत..

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर 'आई कुठे काय करते'च्या लेखिकेचा परखड सवाल
Madhurani Prabhulkar and Mugdha GodboleImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2022 | 8:00 AM
Share

8 मार्च, जागतिक महिला दिन (International Women’s Day). स्त्रीवाद, महिला सशक्तीकरण, स्त्री-पुरुष समानता असे विषय विविध माध्यमांमधून नेहमीच समोर येत असतात. दैनंदिन मालिकासुद्धा याला अपवाद नाहीत. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतील ‘अरुंधती’ या व्यक्तीरेखेने असंख्य महिलांना एक वेगळंच बळ दिलं आहे. आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढणाऱ्या अरुंधतीला हे बळ देणारे हातही एका स्त्रीचेच आहेत. लेखिका मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) हे या मालिकेचं संवादलेखन करतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची ही विशेष मुलाखत..

संवादलेखनाचं आव्हान – संवादलेखनात अनेक पदर असतात. जेवढी कला आहे, तेवढंच ते तंत्र आहे. आपल्या मनात अनेक गोष्टी येऊ शकतात, अनेक गोष्टी सुचू शकतात. दैनंदिन मालिकांमध्ये रिपिटेशन्स होत असतात. यामुळे संवादलेखक म्हणून माझं काम हे असतं की प्रेक्षकांना ते रिपिटेशन्स कमी जाणवेल. 23 मिनिटांच्या एपिसोडमधील पात्रं, त्यांची जागा, पात्रांची वयं, त्यांची मनस्थिती, आधी झालेले सीन्स, नंतर झालेले सीन्स या सगळ्यांचा विचार करून संवाद लिहावे लागतात. टेलिव्हिजनच्या लेखनाचं काम हे बऱ्यापैकी कष्टाचं काम असतं. एकाचवेळी जर दोन-तीन मालिकांसाठी तुम्ही लेखन करत असाल तर ते खूप आव्हानात्मक असतं. साधारणपणे मला एक एपिसोड लिहायला पाच ते सहा तास लागतात. जेव्हा मी तीन मालिकांसाठी लेखन करत असते, तेव्हा मला दिवसातील पंधरा तास लेखन करावं लागतं. मधल्या काळात आयत्या वेळी, घाईघाईने काम यायचं. घाई हा या माध्यमाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. पण गेल्या काही वर्षांत ते चित्र बदललं. घाईने काम करून दर्जा घसरतो, हे बहुतेकांच्या लक्षात आलंय. हा चांगला बदल आहे.

मालिकेच्या कथानकात, भूमिकेत बदल केले जातात. अशा वेळी लेखकांवर येणारा ताण – ताण निश्चितच येतो. पुढे काय घडणार याचं चित्र लेखनाच्या मनात असतं, किंबहुना ते असणं गरजेचं असतं. त्यामध्ये आयत्या वेळी काही बदल आले, तर एका व्यक्तीपुरता बदल करून चालत नाही. त्याबरोबर आजूबाजूच्या पाच-सहा व्यक्तीरेखांमध्येही बदल आणावे लागतात. कोविडच्या काळात लेखकांचे खरंच हाल झाले. हे कुणाच्याच हातात नव्हतं. आदल्या रात्री कलाकार फोन करून सांगायचे की मला बरं वाटत नाहीये, आणि दुसऱ्या दिवशी त्या कलाकाराचे सहा किंवा सात सीन्स प्लॅन केलेले आहेत. अशा वेळी प्रॉडक्शनला निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. पण लेखकांच्या हातात अशा वेळी काहीच नसतं. ती व्यक्तीरेखा पुढचे चार दिवस नसेल की पंधरा दिवस नसेल हे मला माहितच नाही. अशा परिस्थितीत लेखकांवर खूप ताण आला.

ज्या भाषेत तुम्ही लेखकांना शिव्या घालता, ते कुठल्या संस्कारांचं लक्षण आहे? – आपल्याकडे ट्रोलिंग हा प्रकार भयंकर वाढला आहे. पण लेखक गेल्या दोन-अडीच वर्षांत कोणत्या परिस्थितीतून गेलेत, हे सांगून तिऱ्हाईताला कळणं अवघड आहे. ट्रोलिंग झालं की खूप वाईट वाटतं. हे माध्यम असं आहे, की कोणीही याच्याविषयी काहीही बोलतं. क्रिकेट आणि टेलिव्हिजन ही दोन माध्यमं अशी आहेत की यांच्याविषयी कोणीही काहीही बोलतं. आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की एखादी मालिका आवडली तर ती त्यातल्या कलाकारांमुळे आवडते आणि आवडत नाही तेव्हा लेखकांना वेड लागलंय असं म्हणतात. अशा वेळी असं वाटतं, जरा यामागे काय कष्ट आहेत किंवा ही यंत्रणा कशी आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आज माझ्या डोक्यात आलं म्हणून मी लिहिलं असं नसतं. त्यामागे १५-१६ जणांची एक टीम असते. ही एक मोठी साखळी आहे, जे डोळ्यात तेल घालून स्क्रिप्ट वाचत असतात, त्याचा विचार करत असतात. पुढे काय करायचं याच्याविषयी सातत्याने बोलत असतात. फक्त लेखकाच्या हातात काही नसतं. लेखक नशा करून लिहितात का, गांजा मारून लिहितात का, अशा पद्धतीने जेव्हा टीका होते, तेव्हा मला खरंच असं सांगावंसं वाटतं की मी जेव्हा पहाटे चार वाजता उठून एपिसोड लिहायला लागते. तेव्हा चार वाजता उठून नशा करते आणि लिहायला लागते, असं नसतं ना. आपण जे प्रेक्षकांना देत आहोत, त्यातून किमान रिस्पेक्टबलिटी मिळावी, मालिका आवडावी इतकीच अपेक्षा असते. त्यामुळे सरसकट लेखकांबाबत जे ट्रोलिंग केलं जातं, ते पाहून खूप वाईट वाटतं. लेखकांवर संस्कार झाले नाहीत का, असं ते जेव्हा म्हणतात, तेव्हा मला खरंच असं विचारावंसं वाटतं की, ज्या भाषेत तुम्ही आता लेखकांना शिव्या घालत आहात, ते कुठल्या संस्काराचं लक्षण आहे.

महिलांना प्रत्येक दिशेने ओढणाऱ्या, खेचणाऱ्या प्रचंड गोष्टी – आपला फोकस ढळू न देणं. प्रत्येक दिशेने आपल्याला ओढणाऱ्या, खेचणाऱ्या प्रचंड गोष्टी असतात. अगदी घरगुती कामांपासून, सणवारांपर्यंत, मुलांच्या शाळेच्या गोष्टी असतात. अशावेळी फोकस ठेवून आपलं काम करत राहणं याला वेगळ्या प्रकारची शक्ती लागते. आणि ती शक्ती मिळवणं आणि कधीकधी या सगळ्यांपासून मानसिकदृष्ट्या स्वत:ला बाजूला करणं महत्त्वाचं असतं. मेंदूला एक प्रकारचं ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. आपण योग्य मार्गावर आहोत, असं स्वत:वर बिंबवत राहायचं आणि आपलं काम करत राहायचं.

मेंदूला विश्रांती देणं गरजेचं – स्वत:च्या मेंदूला विश्रांती देणं गरजेचं असतं. वेगळं काहीतरी बघणं, वेगळं काहीतरी वाचणं गरजेचं असतं. आपण ज्या पद्धतीचं काम करत आहोत, तर व्यायाम म्हणून वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करणं गरजेचं असतं. जेणेकरून मेंदूला ब्रेक मिळतो. लेखकाला शारीरिक व्यायाम खूप गरजेचा असतो. रोज एक तास कुठलातरी प्रकारचा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. ते मी आवर्जून करते.

‘अरुंधती’चा फेमिनिस्म – पहिल्या दिवसापासून आम्ही एकच काळजी घेतली ती म्हणजे यातला प्रत्येक कॅरेक्टरची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. ती प्रेक्षकांच्या दृष्टीने कन्विन्सिंग असली पाहिजे. जेव्हा अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यामधला संवाद होतो, तेव्हा दोघांचे सीन्स हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अत्यंत स्पष्ट असले पाहिजेत. पण आपल्याला अरुंधतीचं मत जास्त पटलं पाहिजे. ही त्यातली कसरत आहे. बऱ्याचदा हिरोईनला मोठं करायचं असेल तर इतर भूमिकांना मूर्ख ठरवलं जातं. तो सोपा मार्ग आहे. पण या मालिकेच्या बाबतीत आम्ही असं करत नाही. संजना असेल, अनिरुद्ध असेल, अरुंधतीची सासू असेल.. त्यांची वैचारिक जडणघडणसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, असा आमचा प्रयत्न आहे. मग प्रेक्षकांना ठरवू दे की त्यांना यातलं काय बरोबर वाटतंय. त्याच्यामुळे अरुंधती ही व्यक्ती म्हणून किंवा व्यक्तीरेखा म्हणून कोणाला ओव्हरपॉवर करत नाही. बाकी सगळे सुद्धा आपापल्या जागी क्लिअर असतात. म्हणूनच जेव्हा अनिरुद्ध किंवा संजना त्यांचा स्टँड मांडतात, त्या त्या वेळी तेसुद्धा बरोबर वाटतात. फेमिनिस्म म्हणजे बायकांनी भांडणं किंवा पुरुषांना ओव्हरपॉवर करणं नाही, मी त्याचा अर्थ असा काझता की सारासर विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची मुभा असणं, ते स्वातंत्र्य असणं.

हेही वाचा:

‘झुंड’ने बॉक्स ऑफिसच्या कमाईची अपेक्षा पूर्ण केली का? नागराज म्हणतात..

‘एक सणाचं गाणं’, झुंडमधल्या आंबेडकर जयंतीच्या गाण्यावर गणेश मतकरींचं वक्तव्य, वाचा चर्चेतल्या पोस्टमधले 5 मोठे मुद्दे

Follow Us
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......