भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ…
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने धडक कारवाई करत अनेक बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचा घरी धाडी टाकल्या होत्या.

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचे नाव ड्रग्ज प्रकरणात आल्यानंतर अनेकांना मोठा धक्काच बसला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. ड्रग्ज प्रकरणात हर्ष आणि भारतीला अटकही करण्यात आली होती, ते दोघेही जामिनावर बाहेर आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारती आणि हर्षचे ड्रग्ज प्रकरण शांत झाल्याने सर्व काही अलबेल असतानाच आता भारती आणि हर्ष बरोबरच त्यांच्या चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी पुढे येतंय.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीकडून कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात तब्बल 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे भारती आणि हर्षच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार हे आता जवळपास निश्चितच आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने धडक कारवाई करत अनेक बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचा घरी धाडी टाकल्या होत्या. ड्रग्ज प्रकरणात फक्त भारती नव्हे तर सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोण यांचेही नावे पुढे आली होती.
एनसीबीने 2020 मध्ये भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला होता. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिथून 86.5 ग्रॅम गांजा मिळाला. त्यानंतर हर्ष आणि भारती यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर करून त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.