सलमानच्या 23 वर्षे जुन्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, प्रचंड गर्दी, त्या गाण्यावर सर्वच थिरकले

सलमान खानच्या 23 वर्षे जुन्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. री-रिलीज होताच चित्रपटातील त्या गाण्यावर थिएटरमध्ये चाहत्यांचा डान्स.

सलमानच्या 23 वर्षे जुन्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, प्रचंड गर्दी, त्या गाण्यावर सर्वच थिरकले
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 28, 2026 | 1:11 PM

2003 साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातील सलमान खानचा ‘राधे’ आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्या काळात सलमानची हेअरस्टाईल, संवादफेक आणि भावनिक अभिनय प्रचंड ट्रेंड झाला होता. आजही अनेक जण ‘राधे कट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या हेअरस्टाईलची आठवण काढतात.

अलीकडेच ‘तेरे नाम’ पुन्हा एकदा चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला आहे. या निमित्ताने पहिल्या दिवशी पहिल्या शोला मोठ्या संख्येने चाहते थिएटरमध्ये दाखल झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये प्रेक्षक स्क्रीनसमोर उभे राहून गाण्यांवर डान्स, शिट्ट्या मारताना आणि टाळ्यांचा कडकडाट करताना दिसत आहेत.

विशेषतः ‘लगन लगी’ या गाण्यावर चाहत्यांनी अक्षरशः थिएटरमध्ये जल्लोष केला. काही प्रेक्षक सीटवरून उठून स्क्रीनसमोर जाऊन नाचताना दिसले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. फेव्हरेट गाणं, ईदला रिलीज व्हायला हवं होतं अशा कमेंट्स पाहायला मिळाल्या आहेत.

भावनिक कथा

‘तेरे नाम’ची कथा एका तापट स्वभावाच्या तरुणाभोवती फिरते. ज्याला एका साध्या, निरागस मुलीवर प्रेम जडते. मात्र त्याच्या वाट्याला प्रेमापेक्षा वेदना आणि शिक्षा येते. चित्रपटाचा क्लायमॅक्स आजही अनेकांना अस्वस्थ करून जातो. त्यामुळेच हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो.

या चित्रपटासाठी सुरुवातीला आमिर खानला ऑफर देण्यात आली होती. पण त्याने चित्रपट नाकारला नाही, मात्र भूमिकेसाठी स्वतःला तयार करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मागितला होता. निर्मात्यांकडे इतका वेळ उपलब्ध नसल्याने प्रकल्प पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर ही ऑफर अनिल कपूरकडे गेली, पण त्याने कथा ऐकल्यानंतर नकार दिला.

शेवटी सलमान खानने कथा ऐकताच होकार दिला. असे गीतकार समीर अंजन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या मते, त्या काळात सलमान स्वतः वैयक्तिक आयुष्यात कठीण टप्प्यातून जात होता. 2002 साली त्याचा ऐश्वर्या राय सोबत ब्रेकअप झाला होता आणि त्या काळात त्याच्या वागणुकीतही बदल जाणवत होता.

गाण्यांमागची भावनिक कथा

‘क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती’ हे गाणं ऐकताना सलमान खूप भावूक झाला होता असे समीर अंजन यांनी सांगितले होते. या गाण्यात कोणताही बदल न करता ते जसे आहे तसेच ठेवण्याचा आग्रह सलमान खानने धरला होता. त्या काळातील त्याची मानसिक अवस्था आणि चित्रपटातील राधेचे दुःख यामुळेच त्याची ही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाली.

Follow Us