
The Kerala Story 2 : 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या The Kerala Story 2 या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिति भाटिया यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याबाबत काही वादग्रस्त चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री उल्का गुप्ता हिने एका मुलाखतीत या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
The Kerala Story 2 या चित्रपटाची कथा भारतातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन तरुण मुलींच्या आयुष्याभोवती फिरते. सुरेखा, नेहा आणि दिव्या या तीन मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले जाते तसेच त्यांच्यावर अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक दबाव टाकले जातात. कथेत त्यांना जबरदस्तीने रेड मीट खायला दिल्याचेही दाखवले आहे.
‘मी रेड मीट खाल्लं नाही’ – उल्का गुप्ता
चित्रपटातील एका सीनमध्ये रेड मीट खाण्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की हा सीन करताना अभिनेत्रीने खरोखरच रेड मीट खाल्ले का?
या प्रश्नावर उल्का गुप्ता हिने स्पष्ट सांगितले की तिने प्रत्यक्षात रेड मीट खाल्ले नाही. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘मी पूर्णपणे शाकाहारी आहे. मग लोकांना असं का वाटतं की मी खरंच मांस खाईन? चित्रपट अधिक वास्तववादी दिसावा म्हणून मी असं करेन असं नाही.’ तिने पुढे सांगितले की, तिला त्या सीनमध्ये हवा खायला दिली असती तरी तिने तो सीन तितक्याच प्रभावीपणे केला असता.’
ट्रोलिंग आणि धमक्यांचा सामना
उल्का गुप्ता हिने या मुलाखतीत आणखी एक धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की या चित्रपटामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही लोकांनी तिच्या वडिलांनाही धमक्या दिल्या. ती म्हणाली, ‘लोक विचारत होते की हा रोल करण्यासाठी तुला किती पैसे मिळाले? तू समाजात द्वेष पसरवत आहेस असेही आरोप करण्यात आले.’
उल्काने सांगितले की तिचे वडीलही अभिनेते आहेत आणि त्यांनी इन्स्टाग्रामवर आपला मोबाईल नंबर शेअर केला होता. त्यांना वाटत होते की कदाचित एखादा कास्टिंग डायरेक्टर कामासाठी फोन करेल. मात्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच नंबरवरून धमकीचे कॉल येऊ लागले. ती म्हणाली, ‘माझे बाबा निरागसपणे लोकांना समजावत होते की ती फक्त अभिनय करते आहे. एक अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात.’