एवढं इमोशनल गाणं की गायकालाही अश्रू अनावर, 26 वर्षांपासून लग्नात हमखास वाजतंच हे गीत..
"धडकन" चित्रपटातील हे गाणं आजही प्रत्येक लग्नसमारंभाचा अविभाज्य भाग आहे. नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील हे गाणं वधूच्या मनातल्या भावना, तिची खंत आणि आनंद एकाच वेळी व्यक्त करतं. या गाण्याची निर्मिती आणि रेकॉर्डिंगदरम्यान घडलेल्या भावूक प्रसंगांमुळे ते अधिकच अजरामर झालं .

काही गाणी अशी असतात जी आपल्या मनात घर करतात, आपल्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनतात. हिंदी चित्रपटसृष्टीतलं असं एक अजरामर गाणं, जे आजही बहुतांश लग्नात हमखास वाजतंच. या गाण्यातून वधूच्या मनातील खंतही व्यक्त होते आणि लग्नामुळे तिच्या मनात असलेला उत्साह, आनंदही दिसून येतो. बऱ्याच लग्नसमारंभात हे गाणं वाजतं आणि उपस्थितांनाही अश्रू अनावर होतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध गायक नुसरत फतेह अली खान यांचा आवाज लाभला. त्यांच्या आवाजतलं हे गाण अजरामर झालं, त्याशिवाय प्रत्येक लग्न अगदी अधुरं वाटतं.
कोणतं आहे ते गाणं ?
2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटातील ‘दूल्हे का सेहरा सुहाना लगता है’ हे गाणं आजही लग्नसमारंभ आणि विशेषतः पाठवणीच्या वेळी आवर्जून लावलं जातं. शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला नदीम-श्रवण यांनी संगीत दिले असून, उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजाने त्याला एक वेगळीच भावनिक उंची मिळाली. विशेष म्हणजे, या गाण्याच्या निर्मितीमागची कहाणीही तितकीच भावूक करणारी आहे. गाण्याचे बोल ऐकल्यानंतर, या गाण्याला आवाज देणारे नुसरत फतेह अली खान इतके भावुक झाले की त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. सुरुवातीला तर ते हे गाणं गाण्यासाठी तयारच नव्हते. मात्र, संगीतकार नदीम यांच्या आग्रहानंतर त्यांनी अखेर या गाण्याला आपला आवाज दिला.
रेकॉर्डिंगच्या वेळेसही आले अश्रू
मात्र, रेकॉर्डिंगदरम्यानही ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. गाण्यातील एक ओळ म्हणताना, ते अक्षरशः रडू लागल्याचं बोललं जातं. नदीम यांना मात्र हे गाणे नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातच हवं होतं आणि त्यामुळे त्यांच्या आवाजातील त्या भावना गाण्यात तशाच जपल्या गेल्या.
आजही तितकंच लोकप्रिय
रिलीज झाल्यानंतर हे गाणं लग्न आणि वधच्या पाठवणीच्या प्रसंगी सर्वाधिक वाजवली जाणाऱ्या गाण्यांपैकी एक बनलं. यूट्यूबवरही या गाण्याने कोट्यवधी व्ह्यूज मिळवत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. ‘पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, अब तो हर अपना बेगाना लगता है’ – गाण्यातील ही ओळ तर नववधूच्या मनातील भावनांचं अगदी अचूक वर्णन करते. लग्नानंतर एका क्षणात बदलणारी नाती, माहेर सोडतानाची हुरहूर आणि आपलीच माणसं क्षणात परकी होण्याची भावना—या सगळ्या भावनांचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो.