वहिनीची साडी, आईचे दागिने, आश्रमात सप्तपदी.. अभिनेत्रीला लग्नाच्या पाचव्याच दिवशी हवा होता घटस्फोट
अभिनेत्री टीना पारेखनं व्हिडीओ पोस्ट करत लग्नातील खास आठवण सांगितली आहे. 'कहानी घर घर की' या मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली.

निर्माती एकता कपूरने टीव्ही इंडस्ट्रीत अनेक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिका तुफान गाजल्या आणि त्यातील कलाकारसुद्धा घराघरात लोकप्रिय झाले. अशीच एक मालिका म्हणजे ‘कहानी घर घर की’. या मालिकेनं अभिनेत्री साक्षी तंवरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. याच मालिकेत साक्षी तंवरच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका अभिनेत्री टीना पारेखने साकारली होती. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत टीनालाही चांगलीच प्रसिद्ध मिळाली होती. तरीसुद्धा तिने इंडस्ट्रीपासून अचानक फारकत घेतली. सध्या टीना तिच्या लग्नाच्या प्रसंगामुळे चर्चेत आली आहे.
टीना पारेखनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्त खास आठवण सांगितली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ’20 वर्षांपूर्वी जेव्हा मी वैवाहिक आयुष्याच्या नवीन आणि अनोळखी प्रवासाला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच संसार थाटला, तेव्हा मला एक गोष्ट नक्की माहीत होती की मला माझ्या हृदयाच्या सर्वांत जवळच्या स्त्रियांच्या आशीर्वादाची खूप गरज होती. म्हणूनच मी लग्नातील माझा लूक तयार करण्यासाठी त्या सर्वांच्या खास गोष्टी एकत्र आणल्या होत्या. मी माझ्या लग्नात वहिनीची साडी नेसली होती.’
टीना पारेखची पोस्ट-
‘मी 10 वर्षांची असताना माझ्या आजीला सांगितलं होतं की मला तिच्या सोन्याच्या बांगड्या खूप आवडतात. त्याच बांगड्या मी माझ्या लग्नात घातल्या होत्या. हे जग सोडण्यापूर्वी तिने माझ्या वडिलांना सांगितलं होतं की त्या बांगड्या फक्त मलाच द्याव्यात, दुसऱ्या कोणालाही नाही. मी खूप लहान वयात माझ्या मामांना गमावलं. पण माझ्या आत्या आणि आजीने सर्व परंपरा पाळत माझ्यासाठी ओढणी आणली. माझ्या लग्नाचे दागिने मला आईने दिले. त्यामुळे या माझ्या काही उसन्या, काही आशीर्वादाने मिळालेल्या गोष्टी होत्या’, असं तिने पुढे लिहिलं आहे.
विशेष म्हणजे टीनाने तिच्या लग्नासाठी आलिशान हॉटेल किंवा पर्यटनस्थळ नव्हे तर एका साध्या आश्रमाला निवडलं होतं. 2007 मध्ये तिने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात अत्यंत साध्या समारंभात प्रसिद्ध संगीतकार विक्रम हाजरा यांच्याशी लग्न केलं होतं. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत टीना यांनी सांगितलं होतं की, लग्नाच्या पाचव्या दिवशीच तिला तिच्या पतीला घटस्फोट देऊन माहेरी परत जावंसं वाटलं होतं. कारण सुरुवातीला विक्रम यांचे कुटुंबीय या दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. यामुळे तिला मानसिक त्रास झाला आणि तिने विक्रमला स्पष्ट स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की तिला घरी परत जायचं आहे.