Trisha Krishnan | तृषा कृष्णन वयाच्या 40 व्या वर्षी लग्नगाठ बांधण्यास सज्ज; आधी मोडला साखरपुडा
अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 40 व्या वर्षी ती लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी तृषाचा साखरपुडा मोडला होता. आता तृषा पुन्हा एकदा तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : ऐश्वर्या रायसोबत मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये झळकलेली तृषा कृष्णन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तृष्णाने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच हिंदीतही काम केलं आहे. सध्या तृषा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिचं खासगी आयुष्य. वयाच्या 40 व्या वर्षी तृष्णा तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार असल्याचं समजतंय. तृषा एका मल्याळम निर्मात्याच्या प्रेमात असल्याचं कळतंय. ती लवकरच तिच्या लग्नाची औपचारिक घोषणा करू शकते. तृषाचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत होतं. याआधी तिचा साखरपुडा झाला होता. मात्र लग्नाआधीच तो साखरपुडा मोडला.
जानेवारी 2015 मध्ये तृषाचा चेन्नईमधील बिझनेसमन वरुणशी साखरपुडा झाला होता. मात्र काही महिन्यांतच हा साखरपुडा मोडला. तृषाने चित्रपटांमध्ये काम केलेलं वरुणला पसंत नव्हतं, असं यामागचं कारण म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर त्याला तृषा आणि अभिनेता धनुष यांची मैत्री अजिबात पसंत नव्हती. साखरपुड्याच्या आधी तृषाचं नाव ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा डग्गुबत्तीशीही जोडलं गेलं होतं. या दोघांचा एक फोटोसुद्धा लीक झाला होता. याशिवाय थलपती विजयसोबतही तृषाच्या अफेअरच्या चर्चा होत्या.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तृषाला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने अद्याप लग्नाबद्दल फारसा विचार केला नसल्याचं सांगितलं. “एक जबाबदारी म्हणून लग्न करावं आणि नंतर घटस्फोट घ्यावा, अशा नात्यात मला राहायचं नाही. माझे जवळचे व्यक्ती, मित्रमैत्रिणींमध्येही असे काहीजण आहेत, जे लग्नानंतर सुरुवातीला फार खुश होते. पण आता तेच घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे लग्न करण्याआधी बऱ्याच गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मी अद्याप योग्य व्यक्तीला भेटले नाही, ज्याच्यासोबत मला लग्न करावंसं वाटेल”, असं ती म्हणाली होती.
तृषाच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, ‘पोन्नियिन सेल्वन 2’नंतर तिच्या हातात बरेच प्रोजेक्ट्स आहेत. ‘लिओ’ या आगामी तमिळ चित्रपटात ती झळकणार आहे. लोकेश कनगराजने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून एस. एस. ललित कुमार यांची निर्मिती आहे. यामध्ये विजय आणि तृषा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबतच संजय दत्त, अर्जुन सरजा, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 19 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.