4 तासांपर्यंत मी एकदाही..; ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर विराट कोहलीची पोस्ट, रणवीरबद्दल म्हणाला..
Virat Kohli On Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता विराट कोहलीनेही या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

Virat Kohli On Dhurandhar 2: अभिनेता रणवीर सिंहने ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर मोठा इतिहास रचला आहे. 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. थिएटर्सपासून सोशल मीडियापर्यंत ‘धुरंधर 2’ची क्रेझ पहायला मिळतेय. बॉलिवूड, टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यातच आता क्रिकेटर विराट कोहलीची भर पडली आहे. रणवीरच्या या चित्रपटाने किंग कोहलीचंही मन जिंकलं आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने या चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. विराट कोहलीने ‘धुरंधर 2’ हा चित्रपट पाहिला आणि हा एकंदर दमदार सिनेमॅटिक अनुभव असल्याचं त्याने म्हटलंय.
काय म्हणाला विराट?
‘आज मी हा चित्रपट पाहिला आणि मी हे सांगू शकतो की भारतात मला असा सिनेमॅटिक अनुभव पहिल्यांदाच आला आहे. या चित्रपटाने माझ्या मनातील प्रत्येक भावना जागृत केली आणि जवळपास चार तास मी क्षणभरही जागेवरून हललो नाही’, अशा शब्दांत विराटने त्याचा अनुभव सांगितला. या पोस्टमध्ये पुढे दिग्दर्शक आदित्य धरचा उल्लेख करत विराटने लिहिलं, ‘तुम्ही जे काही निर्माण केलं आहे, त्यात तुमची प्रतिभा स्पष्ट दिसून येते. तुम्हाला खरंच सलाम! तुम्ही अत्यंत प्रतिभावान व्यक्ती आहात.’
विराटने अभिनेता रणवीर सिंहचंही कौतुक केलं आहे. ‘चित्रपटातील सर्वच कलाकार आपापल्या भूमिकेत चांगले दिसले, पण रणवीर.. या चित्रपटानंतर तू एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहेस आणि तुझा अभिनय अत्यंत उच्च दर्जाचा आहे. खरोखरंच अप्रतिम’, असं त्याने म्हटलंय.
विराटसोबतच त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही ‘धुरंधर 2’वर प्रतिक्रिया दिली आहे. तिलाही रणवीरचा हा चित्रपट खूप आवडला आहे. अनुष्काने रणवीरसोबतच राकेश बेदी आणि आर. माधवन यांसारख्या कलाकारांची प्रशंसा केली. या चित्रपटाच्या प्रचंड यशाबद्दल अनुष्काने सर्व कलाकारांचं अभिनंदन केलं.
‘आदित्य धर.. काय जबरदस्त चित्रपट तू बनवला आहेस. चार तासांचा असा चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड दृढ विश्वास हवा असतो. संपूर्ण चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. अत्यंत विचारपूर्वक प्रत्येक रचना केली आहे. तू खरंच ओरिजिनल आणि विश्वासू दिग्दर्शक आहे. रणवीर सिंहने तर त्याच्या करिअरमधील सर्वांत जबरदस्त भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेत कोणतीच चूक काढता येणार नाही. आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी सर आणि इतर प्रत्येक कलाकाराने चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे’, अशी पोस्ट अनुष्काने लिहिली आहे.