‘ईठा’ चित्रपटाला आमचा विरोध, विठाबाई नारायणगांवकर यांची मुलेही नाराज, म्हणाली…
श्रद्धा कपूरचा 'ईठा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जाते, त्या विठाबाई नारायणगांवकर यांच्या कुटुंबीयांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

विक्की कौशल याला घेऊन ‘छावा’ सारखा चित्रपट देणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पुन्हा लाईमलाईटमध्ये आले आहेत. आता ते लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटात विठाबाईंची भूमिका श्रद्धा कपूर करणार असल्याने या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीझर रिलीजनंतर चाहत्यांची आशा वाढल्या आहेत. या चित्रपटात अजय-अतुल संगीताची काय मेजवाणी देणार याकडे तमाम रसिकांच्या नजरा लागल्या असतानाच या चित्रपटावर संकटाचे ढग जमा झाले आहेत.
ईठा चित्रपटाचा वाद काय ?
‘ईठा’ चित्रपटाच्या टीझर रिलीजनंतर आता वाद निर्माण झाल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने या चित्रपटाचे ईठा टायटलवरच आक्षेप घेतला आहे. त्यांच्यामते हे टायटल अयोग्य आहे. या चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी या पक्षाने केली आहे. तमाशा सम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतलेले या सिनेमाचे टायटल ‘ईठा’ च्या ऐवजी विठाबाई देखील ठेवता आले असते असे म्हटले आहे.
आता या विठाबाईच्या कुटुंबियांनी देखील याचे समर्थन केले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी या टायटलला विरोध केला आहे.विठाबाई या महाराष्ट्राच्या सर्वात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना होत्या. त्यांचे योगदान दाखवणारे टायटल हवे होते. त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा जपली गेली असती असे एनसीपीचे फिल्म आणि सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण उतेकर यांची प्रतिक्रिया काय ?
या वादावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर वा मॅडॉक फिल्मसचे प्रमुख दिनेश विजन यांचा कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाचा वाद झाल्याचा हा पहिलाच प्रकार नाही. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवल्याने देखील वाद झाला होता. या वादानंतर हा सीन चित्रपटातून हटवण्यात आला होता. ईठा चित्रपटाची रिलीज डेट २८ ऑगस्ट असून यात रणदीप हुड्डा आणि झीशान आयुब सारखे कलाकार देखील आहेत.