
Rajesh Khanna : हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात राजेश खन्ना हे नाव ‘पहिला सुपरस्टार’ म्हणून सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पण या अफाट यशाच्या आणि प्रकाशझोतातल्या आयुष्याच्या मागे एक भावनिक प्रेमकहाणीही दडलेली होती. ज्यात प्रेम, मत्सर, तुटलेला विश्वास आणि सूडाची छटा होती. ही कथा आहे त्यांची दीर्घकाळची प्रेयसी अंजू महेंद्रू यांच्यातील गाजलेल्या नात्याची.
राजेश खन्ना सुपरस्टार होण्यापूर्वीच अंजू महेंद्रू त्यांच्या आयुष्यात आल्या होत्या. दोघेही त्या काळात संघर्ष करत होते. थिएटरमध्ये काम करताना त्यांची ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या काळात दोघेही एकमेकांच्या स्वप्नांचे आणि अपयशांचे साक्षीदार होते. परंतु काळ बदलला तसे नात्याचे स्वरूपही बदलू लागले. राजेश खन्ना यशाच्या शिखरावर पोहोचले. सलग हिट चित्रपट, चाहत्यांची गर्दी आणि माध्यमांतील चर्चेमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व झपाट्याने बदलत गेले.
करिअरवरून वाढलेले मतभेद
अंजू महेंद्रू त्या काळात उभरत्या अभिनेत्री होत्या आणि स्वतंत्रपणे काम करत होत्या. मात्र, राजेश खन्ना यांना पत्नी म्हणून घर सांभाळणारी, करिअरला दुय्यम स्थान देणारी पत्नी हवी होती. त्यांनी अंजूवर अनेकदा अभिनय सोडण्याचा दबाव आणल्याचे म्हटले जाते. अंजू मात्र स्वतःची ओळख आणि करिअर गमावण्यास तयार नव्हत्या. याच कारणावरून दोघांत वारंवार वाद होऊ लागले.
याच काळात अंजू महेंद्रू यांच्या आयुष्यात वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू Gary Sobers आले. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि साखरपुड्यापर्यंतही गोष्ट पोहोचली. पण अखेरीस गॅरी सोबर्स यांच्यासोबतचा संबंध तुटला.
डिंपल कपाडिया यांच्याशी अचानक लग्न
राजेश खन्ना यांच्या मते, तो क्षण असा होता जेव्हा ते खूप निराश आणि भावनिकदृष्ट्या खचलेले होते आणि त्यांना अंजूंच्या सहवासाची गरज होती. पण त्या एका पार्टीसाठी बाहेर जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्या क्षणी त्यांच्या मनात काहीतरी तुटल्याची भावना निर्माण झाली. त्यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘त्या क्षणी माझ्या मनातील प्रेम संपले.’
त्यानंतर राजेश खन्ना यांनी स्वतःपेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न करण्याची घोषणा केली. ही बातमी ऐकून अंजू महेंद्रू यांना धक्का बसल्याचे म्हटले जाते. अशीही चर्चा आहे की, राजेश खन्ना यांनी आपल्या लग्नाची बारात जाणीवपूर्वक अंजू महेंद्रू यांच्या घरासमोरून काढण्याचा निर्णय घेतला. या कृतीतून त्यांनी आपले नाते संपल्याचे आणि आपण पुढे निघून गेल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असे त्या काळी बोलले जात होते.